नगर: पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेत जिल्हा परिषदेने यंदा तब्बल 10 लाख वृक्ष लागवडीचे महत्वकांक्षी उद्दीष्ट्ये निश्चित केले आहे. त्यासाठी झेडपीचे सर्व विभाग तसेच सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षी सात लाख वृक्षांची लागवड यशस्वी झाल्यानंतर यंदा अधिक व्यापक नियोजनासह हरित जिल्ह्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत.
जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून गतवर्षी जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7.5 लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. यामध्ये ‘मियावाकी’ प्रकल्पांतर्गतही अनेक ठिकाणी मिनी जंगल निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. काही अपवाद वगळता अनेक ठिकाणी ही वृक्ष लागवड यशस्वी झाल्याचे दिसले. त्यामुळे यावषीर्ही पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी जिल्हा परिषदेने मायक्रो प्लॅन केला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या सुचनांनुसार वृक्ष लागवडी मोहीमेचे नोडल अधिकारी सुधीर शिंदे यांनी सर्व विभागांना सोबत घेत 10 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी 14 ट्री, देवराई तसेच सेट्री अशा सामाजिक संस्थांनाही सोबत घेतले आहे. अनेक ठिकाणी त्यांची खड्डे घेण्याची कामेही सुरू झाली आहेत.
जिल्हा परिषदेचे सर्व विभाग पुढे !
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी ग्रामपंचायतींच्या मोकळ्या जागांवर, नरेगाचे सातपुते, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि माध्यमिकच्या संध्या गायकवाड यांनी शाळा, महाविद्यालय परिसरात, डॉ. नागरगोजे यांनी आरोग्य केंद्रानजीक, महिला व बालविकास विभागाचे डॉ. संजय कदम यांनी अंगणवाडी परिसरात, पशुसंवर्धनचे दशरथ दिघे, जलसंधारणचे डपकर यांनी आपल्या गावपातळीवरील कायर्ालय, जागांवर वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी संबंधित सर्व विभागप्रमुखांनी आपल्या यंत्रणांना सूचना केल्या आहेत. या संदर्भात सीईओ भंडारी यांनीही प्रशासन आणि सेवाभावी संस्थांसमवेत बैठक घेतली आहे.
वृक्ष लागवडीचे नियोजन
ग्रामपंचायती : 2,11,300
नरेगा : 66,920
प्रा. शिक्षण : 64,440
मा. शिक्षण : 73,790
आरोग्य : 5320
म.बालविकास : 18,105
पशुसंवर्धन : 2485
जलसंधारण : 4100
सेवाभावी संस्था : 4,50,000
संगमनेरात 770 हेक्टरवर वृक्षलागवड
14 ट्री या सामाजिक संस्थेने वृक्ष लागवडीसाठी योगदान देऊ केले आहे. त्यांनी संगमनेर तालुक्यात 770 हेक्टरवर वृक्ष लागवडीचे नियोजन केले असून, त्यासाठी खड्डे तसेच आवश्यक शेततळेही घेतल्याची माहिती पुढे येत आहे. यात साकूरमध्येच 16 हजार झाडे लावण्याचा निर्धार केला आहे.
सीईओंच्या मार्गदर्शनात यावषीर्ही वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या विभाग तसेच काही सेवाभावी संस्थांच्या पुढाकारातून यंदा 10 लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट्ये आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. निश्चितच येणाऱ्या काळात अहिल्यानगर हरीत जिल्हा म्हणून पुढे येताना दिसेल.सुधीर शिंदे, नोडल अधिकारी, वृक्ष लागवड