नगर: पोलिस पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत क्रॉस रेडचा दणकाच सुरू केला. त्यामुळे जिल्ह्यात सिस्टीम बदलाच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यात पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांचाही लेखाजोखा पोलिस अधीक्षकांच्या कानापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कार्यकाळ पूर्ण होवो अथवा न होवो खांदेपालट अटळ आहे, अशी चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्याचा पदभार घेऊन अद्याप एक महिनाही झाला नाही. एक महिन्यात त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. क्राईम मिटिंगमध्ये सर्वच प्रभारी ठाणेदारांना अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले असून, पोलिस कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली आहे. पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देऊनही धंदे बंद होत नसल्याचे सुदर्शन यांनी स्वतः क्रॉस रेडची अंमलबजावणी सुरू केली.
सध्या जिल्ह्यात कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत अन्य कोणत्याही पोलिस ठाण्याचे पथक जाऊन रेड करीत आहे. त्यामुळे प्रभारी ठाणेदारांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची ‘कुंडली’ गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी पोलिस दलातील ठाणे प्रभारींचे खांदेपालट अटळ आहे.
अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित
जिल्ह्यात साधारण एक महिन्यांपासून दप्तरी गुन्ह्यांची नोंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. डायल 112 वर तक्रारी येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात गेल्या एक वर्षभरात अनेक पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांचे तपास प्रलंबित आहेत. त्यात 7 ते 8 खुनाचे गुन्हे अद्याप उघडकीस आलेले नाहीत. त्यामुळे पोलिस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकासह अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
अनेक अधिकाऱ्यांचे ‘बुक रेड’
तत्कालीन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी वेळेत प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याने गोळीबारासह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना घडल्याने सोनई व नगर तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. तर, नेवासा पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बदली केली. आता श्रीरामपूर, पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खळबळ उडविणाऱ्या घटना घडल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांचे ‘बुक’ आणखी रेड होत चालले आहे. त्यामुळे येत्या काळात पोलिस अधिकाऱ्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सक्षम अधिकारी पोस्टिंगच्या प्रतीक्षेत
मागील काही महिन्यामध्ये पोलिस दलाच्या जिल्हा नियंत्रण कक्षात चांगल्या आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर, काही अधिकाऱ्यांना पोलिस ठाण्याऐवजी साईड पोस्टिंग देण्यात आली. या अधिकाऱ्यांनी ठाणे प्रभारी म्हणून चांगली कामगिरी केल्याचे बोलले जात आहे. मात्र, सध्या अनेक महिन्यांपासून हे अधिकारी साईड पोस्टिंग आणि नियंत्रण कक्षात आहेत. ते आता पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत.
मरगळ झटकून काम करणाऱ्यांना संधी
पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी प्रत्येक ठाणे प्रभारीला नागरिकांच्या तक्रारींचा पोलिस ठाण्यातच निपटारा करा, डायल 112 वर लक्ष केंद्रित करा आणि गुन्हे उघडकीस आणण्याला महत्त्व द्या, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मरगळ झटकून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना येणाऱ्या काळात संधी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या
पोलिस दलात अधिकाऱ्यांचे खांदेपालट होणार असल्याच्या चर्चेने सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. नवीन येणारे अधिकारी अवैध धंदे, गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या कोंडीवर कडक कारवाई करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः ग्रामीण आणि संवेदनशील भागातील पोलिस ठाण्यांमध्ये कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.