Maharashtra Hailstorm Damage Pudhari
अहिल्यानगर

Maharashtra Hailstorm Damage: अहिल्यानगर, संगमनेर, जामखेड व श्रीगोंदा तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्याचा कहर

शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसात शेतीचे मोठे नुकसान; कोंबड्यांचा मृत्यू, सोलर पॅनल कोलमडले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

नगर: शुक्रवारी सायंकाळी संगमनेर, जामखेड, नगर आणि श्रीगोंदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वीज कोसळून तीन गायी दगावल्या, तर गारपिटीत ३०० कोंबड्यांचा मृत्यू झाला. संगमनेरच्या पठार भागात छातावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्‌यावर पडले आहेत. वादळात कृषी पंपाचे सोलर पॅनल कोलमडले, तर संत्रा, केळी बागांचे मोठे नुकसान झाले.

श्रीगोंदा तालुक्यातील तरडगव्हाण, घोगरगाव परिसरात शुक्रवारी (दि. ५) दुपारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वार आणि गारांचा पावसाने केळी, संत्रांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. तर, कृषी पंपाचे सोलर कोलमडून पडले. गाराच्या पावसाने झोडपल्याने पोल्ट्री फार्मधील ३०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या.

सीना धरण पट्ट्यातील तरडगव्हाण, लालगीर स्वामी वस्ती, चवरसांगवी, थिटेसांगवी, बनपिंपरी, घोगरगाव (ता.श्रीगोंदा), हातवळण (ता.नगर) यासह आष्टी तालुक्यातील काही गावांना गाराच्या पावसासह वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपून काढले. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. तब्बल एक तास लिंबासारख्या गारा पडत होत्या. शेतातील कृषी पंपाच्या सोलरच्या प्लेटा उडून गेल्या. केळी, संत्रा, जांभूळ बागांचे मोठे नुकसान झाले. झाडे उन्मळून पडली तर, विजे खांबही पडले आहेत. गारांमुळे झाडांची फळे आणि पाने झडून गेली. पाऊस उघडल्याने शेतकऱ्यांनी शेतात धाव घेऊन पाणी बाहेर काढून दिले.

दरम्यान, लालगीर स्वामी वस्ती परिसरात असलेल्या पोल्ट्रीमधील कोंबड्यांना वाऱ्यासह गारांचा मारा सहन झाला नाही. गारांनी कोंबड्या झोडपल्या. त्यात सुमारे ३०० कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली. तरडगव्हाण शिवारासह परिसरातील नुकसानीचे महसूल प्रशासनाने तत्काळ पंचनाम करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जांभूळ बागेचे प्रचंड नुकसान

सीना नदीच्या काठावर असणाऱ्या आष्टी तालुक्यातील हातोळण, औरंगपूर, पारोडी, बोरोडी, बोडखा, वाहिरा परिसरात प्रचंड गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे कांदा पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्यात हातोळण येथे बाळासाहेब मिसाळ यांच्या जांभूळ बागेचे प्रचंड नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT