नगर: महापालिका आर्थिक कोंडीत सापडली आहे. एका बाजूला पाणीपट्टी मालमत्ताकराची थकबाकी डोंगरा एवढी झाली आहे. तर, दुसऱ्या बाजूला बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीसह 230 कोटी 15 लाखांची देणी थकली आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने 14 मार्चपर्यंत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 100 टक्के सवलत देण्यात निर्णय घेतला आहे. नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन थकीत कराचा भरणा करावा व महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.
आयुक्त यशवंत डांगे यांनी महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती देताना सांगितले की, जीएसटी अनुदान (11.72 कोटी) आणि महसुली उत्पन्न (8 कोटी) असे मिळून दरमहा सरासरी 19 कोटी 72 लाख रुपये महानगरपालिकेत जमा होतात. मात्र, कर्मचारी वेतन, निवृत्तीवेतन, पाणी योजना व पथदिव्यांची वीज बिले आणि इतर अत्यावश्यक सेवांचा मासिक खर्च सुमारे 24 कोटी 40 लाख रुपयांवर गेला आहे. यामुळे दर महिन्याला महानगरपालिकेला 4 कोटी 68 लाख रुपयांचा तुटवडा भासत असून देणीही वाढत आहेत.
सद्यस्थितीत महानगरपालिकेला 230 कोटींची देणी आहेत. यात कर्मचारी 7 वा वेतन आयोग फरक 107 कोटी, विकास कामांची देयके 80 कोटी, कुत्र्यांचा बंदोबस्त करणे 50 लाख, विविध योजनांचा मनपा हिस्सा 50 कोटी, पाणी पुरवठा वीज बिल 16.85 कोटी, इतर देयके 9 कोटी, न्यायालयीन प्रलंबित देयके 9 कोटी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी रक्कम 7 कोटी, पुरवठादार देयके 4 कोटी, अशुद्ध पाणी आकार 4 कोटी, वेतन कपात रक्कम 3.50 कोटी. 6 वा वेतन आयोग फरक 3.00 कोटी, 5 वा वेतन आयोग फरक 2 कोटी, सेवा उपदान रक्कम 2 कोटी, परिभाषित निवृत्तीवेतन हिस्सा 1.75 कोटी, अर्जित रजा वेतन रक्कम 75 लाख, कर्मचारी वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके 50.00 लाख, स्ट्रीट लाईट वीज बिल 48 लाख आदींचा समावेश आहे.
महानगरपालिकेचे उत्पन्नाचे प्रमाण कमी आणि अत्यावश्यक सेवांचा खर्च जास्त असल्याने आर्थिक नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाढत्या कराच्या थकबाकीमुळे दंडाची रक्कमही वाढत आहे. परिणामी महानगरपालिकेसह नागरिकांवरही दंडाचा बोजा पडत आहे. या सर्वांचा विचार करून नागरिकांना कराच्या थकबाकी वरील शास्तीमध्ये 14 मार्चपर्यंत 100 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी थकबाकीदारांना थकीत कर एकरकमी जमा करावा लागणार आहे. थकबाकीदार नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन त्यांच्याकडे थकीत असलेल्या कराचा भरणा तत्काळ करावा, असे आवाहन आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे.
दरवर्षी शास्तीमध्ये सवलत जाहीर करूनही अनेक थकबाकीदार कर भरण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. आता पुन्हा शास्तीमध्ये सवलत देण्यात आली असून, थकबाकीदारांनी याचा लाभ घेऊन थकीत कर भरावा. अन्यथा नाईलाजाने थकबाकीदारांवर जप्ती, नळ कनेक्शन तोडून पाणी पुरवठा बंद करणे, अशा कारवाया कराव्या लागतील.यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका