साकत : ऊस पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा, सेंद्रिय खत उपलब्धता, जीवाणू वा गांडुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पाचट जाळू नये. उसाच्या पाचटाची कुट्टी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांनी केले.
साकत येथे शेतकर्यांच्या बांधावर जाऊन घुले व कृषी सहायक समाधान सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी पोपट वराट यांच्या शेतात मारुती वराट यांच्या ट्रॅक्टरने उसाच्या पाचटाची कुट्टी कशी करावी यांचे प्रात्यक्षिक दाखवले. या वेळी शेतकरी उपस्थित होते. या वेळी सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
घुले म्हणाले की, आडसाली उसातून हेक्टरी जवळपास 8 ते 12 टन पाचट निघते. त्या पाचटामध्ये असणारे 40 ते 50 किलो नत्र, 20 ते 30 किलो स्फुरद व 75 ते 100 किलो पोटॅश पुढील पिकास उपलब्ध होते. जवळपास 70 टक्के शेतकरी उसाचे पाचट जाळत आहेत. हे पाचट जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होऊन उष्णतेने जमीन आणि त्यातील उपयुक्त जिवाणू आणि गांडुळावर देखील परिणाम होत आहे. आपण आपल्या हाताने जमिनीचे आरोग्य बिघडवण्यासाठी मदत करत आहोत हे यावरून सिद्ध होते. पाचटातील सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक गुणधर्म सुधारतात. जलसंधारण शक्ती वाढते, असे त्यांनी या वेळी सांगितले.