जामखेड : तालुक्यातील जायभायवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी भुजंग जायभाय हे जिवंत असूनही ग्रामपंचायतीच्या ठरावात ग्रामसेवक व सरपंचाने त्यांना मयत दाखविण्याचा प्रताप केला. याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, यासाठी जायभाय यांचा मुलगा भागवत जायभाय यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर दि. 24 मार्च रोजी उपोषण सुरू केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जामखेडचे गटविकास अधिकार्यांना लेखी तक्रार देऊनही काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी उपोषण सुरू केले.
तक्रारीत भागवत जायभाय यांनी म्हटले की, माझे वडील भुजंग माणिक जायभाय यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर करण्यात आले. परंतु ग्रामसेवक व सरपंचाने संगनमताने लाभार्थी हयात असताना मयत असल्याचे 29 डिसेंबर 2024 च्या ग्रामसभेच्या ठरावात दाखविले. तसेच त्यांना वारसदार नाही, असेही ठरावात नमूद केले. परंतु लाभार्थी भुजंग जायभाय हे सध्या हयात आहेत. त्यांना दोन मुले व तीन मुली आहेत. असे असताना लाभार्थ्यांला वंचित ठेवले. याबाबत संबंधितांनी तक्रार करूनही दखल घेतली नाही. घरकुल तात्काळ मिळावे. लाभार्थी जिवंत असतांना मयत दाखविणार्यांवर निलंबनाची कारवाई करावी, असे तक्रारीत नमूद केले आहे. यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी बी. के. माने, कैलास खैरे, तसेच पोलिस निरीक्षक महेश पाटील, प्रा. मधुकर राळेभात, नय्यूम सुभेदार आदींनी उपोषणार्थींची भेटी घेतली.
29 डिसेंबरला झालेल्या ग्रामसभेत ठराव क्र 4 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचेचा लाभार्थी असताना नाव कमी करण्यासाठी मला मयत दाखवले आहे. त्यामुळे न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याचे भुजंग जायभाय यांनी सांगितले.