कर्जत : आमदार रोहित पवार यांना धक्का देण्यासाठी सभापती राम शिंदे यांनी कर्जत नगरपंचायतमध्ये ऑपरेशन लोटस वापरले. कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या गटाचे आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट आणि पूर्ण बहुमत असतानादेखील पडद्यामागे मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडण्यात त्यांना यश आले आहे. राजकारणामध्ये मुरब्बी व ज्येष्ठ असणारे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना राजकीय शह दिला आहे.
जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर मुंबई येथे विधान भवनामध्ये ज्या 13 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. ते सर्वजण सभापती शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. या सर्व नगरसेवक आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे शाही स्वागत सभापती शिंदे यांनी केले. त्यानंतर या ठिकाणी शिंदे यांच्या उपस्थितीमध्येच अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढे कशा पद्धतीने नगरपंचायतमध्ये काम करता येईल. राज्य सरकारकडून शहराच्या विकासासाठी निधी कसा उपलब्ध करून देण्यात येईल याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर आता प्रस्तावावर मतदान कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी सभापती शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. हे रोहित पवार यांचेच अपयश आहे. येवढे मोठे यश नगरपंचायतीत मिळाल्यानंतर त्यांना नगरसेवकांना संभाळता आले नाही. एवढ्या घडामोडीनंतरही त्यांच्यावर आमदार रोहित पवार एक प्रकार शब्दाने देखील बोललेले नाहीत. हा उठाव आहे. दिलेला शब्द पाळला नाही. अनाबाकाका घेतल्या. त्या पूर्ण केल्या नाहीत. यामुळेच हे घडले आहे. असे सभापती राम शिंदे म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, दहा वर्ष मी लोकप्रतिनिधी कर्जत - जामखेड मतदार संघाचा होतो. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला आहे. हे सर्व नगरासेवक जरा निवडणुकीपूर्वी माझ्यासोबत आले असते तर कदाचित माझा पराभव 622 मतांनी झाला नसता. मात्र तरी देखील मी कोणताही रोष मनामध्ये ठेवलेला नाही. त्यांना लोक सांभाळता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जनतेच्या विकासासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सभापती शिंदे म्हणाले.
गटनेते संतोष मेहत्रे यांनी मार्गदर्शन केले. दोन वर्षांनी निवडणूक होणार आहे. त्यावेळी जनतेला काय विकास कामे केली याची उत्तर द्यावे लागणार आहे . वारंवार विनंती करूनही नगराध्यक्षांची अडीच वर्षाची मुदत संपल्यावरही त्यांना पदावरून दूर केले नाही. नगराध्यक्ष उषा राऊत या पालिकेचे काम कमी पाहतात व त्यांचे सासरे नामदेव राऊत हे जास्त पाहतात यामुळे आम्हाला दुजाभावाची वागणूक मिळत होती, असे मेहत्रे म्हणाले.