Navnath Waghmare Controversial Statement: ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या एका वक्तव्यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. मराठा समाजातील तरुणींबद्दल केलेल्या या वक्तव्याचा मराठा समाजातील महिला आणि विविध संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी काही ठिकाणी आंदोलन करत वाघमारे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नवनाथ वाघमारे यांनी काही ओबीसी नेत्यांच्या कुटुंबातील आंतरजातीय विवाहांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी मराठा समाजातील मुलींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
ओबीसी नेत्यांची मुलं, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्याकडे असलेला पैसा पाहून मराठा समाजातील मुली त्यांच्या घरात लग्न करून जातात, अशा आशयाचे वक्तव्य वाघमारे यांनी केले आहे.
या वक्तव्यामध्ये त्यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबाचाही संदर्भ दिला. तसेच काही ओबीसी नेत्यांच्या कुटुंबांमध्ये मराठा समाजातील मुलींचे विवाह झाल्याचा दावा त्यांनी केला.
वाघमारे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ आणि वक्तव्य समोर आल्यानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः महिलांबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे चुकीचे असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
नांदेडमध्ये सकल मराठा समाजाच्या महिलांनी या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन केले. वाघमारे यांनी महिलांचा आणि मराठा समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत आंदोलकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. आंदोलक महिलांनी वाघमारे नांदेडमध्ये आल्यास त्यांचा निषेध करण्याचा इशाराही दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथेही या वक्तव्याचे पडसाद उमटले. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
शिवसेना नेत्या रेखा कोंडे यांनीही वाघमारे यांच्या वक्तव्यावर टीका केली. हा मुद्दा केवळ मराठा समाजापुरता मर्यादित नसून महिलांच्या सन्मानाशी संबंधित असल्याचे त्यांनी म्हटले.
आज अनेक समाजांमध्ये आंतरजातीय विवाह होत आहेत. त्यामुळे एखाद्या राजकीय नेत्याला लक्ष्य करण्यासाठी त्याच्या कुटुंबातील महिलांचा किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख करणे योग्य नाही, असे कोंडे यांनी सांगितले.
वाघमारे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल मराठा समाजातील महिलांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, या वक्तव्यामुळे मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याभोवतीचा राजकीय वाद आणखी तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर कारवाई होते आणि वाघमारे यांच्याकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.