मुंबई

हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करणार – देवेंद्र फडणवीस

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेनेच्या आमदारांमध्ये रस्सीखेच रंगणार आहे. विशेषत… बाळासाहेबांच्या शिवसेनेत अनेक आमदार इच्छुक असल्याने कोणाकोणाचे समाधान करायचे, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर आहे. फडणवीस यांनी रविवारी नागपूर येथे बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराचा बॉम्ब फोडला.

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते. यंदा डिसेंबरमध्ये नागपूरमध्ये दोन आठवड्यांचे अधिवेशन होईल. राज्य सरकारची तर तीन आठवडेदेखील अधिवेशन चालविण्याची तयारी आहे, असे सांगतानाच या अधिवेशनापूर्वीच
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे 9 आणि शिंदे गटाच्या 9 अशा 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. मात्र मंत्रिमंडळातील अजून 20 जागा रिक्त आहेत. त्यामुळे एका मंत्र्यांकडे दोन दोन खात्याचा आणि जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा भार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा भार आहे. तसेच गृह, वित्त, ऊर्जा, जलसंपदा आदी आठ ते दहा खात्यांचा कारभार ते सांभाळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तर 12 खात्यांचा कारभार आहे. त्यामुळे नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करून मंत्र्यांवरचा कामाचा भार कमी करण्याचे शिंदे – फडणवीस सरकारचे प्रयत्न आहेत. 19 डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे संकेत फडणवीस यांनी दिल्याने इच्छुकांमध्ये आता जोरदार रस्सीखेच रंगणार आहे.

भाजपमध्ये मागील विस्तारात आमदार डॉ. संजय कुटे, देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ, किसन कथोरे, राणा जगजितसिंह पाटील, बबनराव लोणीकर, रणधीर सावरकर, योगेश सागर आदींचा पत्ता कट झाला होता. यावेळी त्यांचा नंबर लागणार का? तर शिंदे गटात तर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजीचे सूर उमटले होते.

राज्यमंत्री असतानाही शिंदे गटात सामील झालेले बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. आमदार संजय शिरसाट यांची नाराजीही लपून राहिली नव्हती. याशिवाय भरत गोगावले, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर अशी नावेही चर्चेत होती. आता फडणवीस यांनीच मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सांगितल्याने मंत्रिमंडळात समावेश व्हावा\ म्हणून दिवाळीनंतर जोरदार लॉबिंग सुरू होणार आहे

SCROLL FOR NEXT