मुंबई

रस्त्यावरून चालणेही ठरतेय जीवघेणे! गतवर्षी राज्यभरात २ हजार ८९४ पादचाऱ्यांचा मृत्यू

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, अरुंद असुरक्षित रस्ते आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे यासारख्या विविध कारणांमुळे राज्यात अपघातांची संख्या वाढत आहे. या अपघातांमध्ये रस्त्यावरुन चा- लताना प्राण गमावलेल्या पादचाऱ्यांची संख्या मोठी आहे. गतवर्षी राज्यात दोन हजार ८९४ पादचाऱ्यांनी विविध अपघातात जीव गमावला. तर २०१९ ते २०२२ या चार वर्षात १० हजार ६१७ पादचारी रस्ते अपघातांचे बळी ठरले आहेत.

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपायोजना करूनही रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी झालेले नाही. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २०१९ ते २०२२ या चार वर्षांमध्ये एकूण १० हजार ६१७ पादचाऱ्यांना अपघातात प्राण गमवावे लागले. २०१९ मध्ये दोन हजार ८४९ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. २०२२ मध्ये यात वाढ होऊन दोन हजार ९८४ पादचाऱ्यांनी जीव गमावला.

रस्ते प्रशस्त, परंतु धोकादायक

राज्यात काही ठिकाणी रस्ते प्रशस्त आहेत, परंतु ते ओलांडण्याच्या दृष्टीने धोकादायक आहेत. त्यामुळे वेगाने येणारी वाहने चुकवत जीव मुठीत घेऊन पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. मोकळ्या रस्त्यावर, महामार्गावर वाहनचालक वेगाने वाहने चालवतात
त्यामुळे महामार्गाच्या आजुबाजुला असलेल्या गावांमधील, शहरांमधील नागरिकांना रस्त्यावरुन चालता येत नाही. काही अपघातांमध्ये पादचाऱ्यांचा निष्काळजीपणाही त्यांच्या जिवावर बेतत आहे.

स्कायवॉक, सबवेचा वापर कमीच

फेरीवाले, रस्त्याच्या कडेला पार्क केलेली वाहने यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास जागाच शिल्लक राहात नाही. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी मोठ्या शहरांमध्ये स्कायवॉक आणि सबवे बांधण्यात आले, मात्र त्यांचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे.

SCROLL FOR NEXT