मुंबई

मुंबईकरांना बेस्टमध्ये प्रवासाची ‘आजादी’; एका रुपयात पाच प्रवास योजनेचा आता 31 ऑगस्टपर्यंत विस्तार

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांना प्रवासाची आजादी दिली आहे. चलोअ‍ॅप वरील एका रुपयात पाच प्रवास योजनेचा विस्तार आता 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आला आहे. चलो अ‍ॅपवर 'सूपर सेवर ऑफर' दिली आहे. प्रवाशांना प्रवासाकरिता ऑनलाइन एक रुपया भरायचा आहे. त्याच्या बदल्यात पाच प्रवास करता येतील. 25 ते 31 जलै दरम्यान बेस्ट प्रशासनाने राबविलेल्या या योजनेला प्रवाशांनी पसंती दिल्याने ती 15 ऑगस्टपर्यंत वाढविली होती. आता पुन्हा या योजनेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रवासी कोणत्याही मार्गावर एसी किंवा साध्या बसने प्रवास करु शकतो. या योजनेचा आतापर्यंत एक लाख मुंबईकरांनी लाभ घेतला असल्याचे बेस्टने सांगितले.

डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी बेस्टने ही योजना आखली आहे. पुर्वी चलो अ‍ॅपवरुन दिवसभरात सुमारे साडेतीन लाख प्रवासी तिकिट काढत होते. ती संख्या आता चार लाखांच्या घरात पोहोचली आहे. 'चलो अ‍ॅप'मध्ये सल्लागार सुविधा उपलब्ध आहेत. या सर्व ऑफर 'चलो अ‍ॅप' वरुन प्रवाशांना मिळतात. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग आणि सामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या ऑफर आहेत.

बसचे लाईव्ह लोकेशन समजण्यास मदत डिजिटल पेमेंट व्यतिरिक्त चलो अ‍ॅपमुळे बसचे लाईव्ह लोकेशन समजते. बस थांब्यावरील प्रवाशांना आपली बस किती वेळात येणार आहे, त्यात गर्दी आहे की नाही याची माहिती अ‍ॅपवर मिळते. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळतो. 21 डिसेंबर 2021 रोजी बेस्ट उपक्रमाने चलो अ‍ॅप प्रवाशांच्या सेवेत खुले केले होते. आतापर्यंत सुमारे 22 लाख मुंबईकरांनी चलोअ‍ॅप डाऊनलोड केले आहे. सध्या बेस्टची प्रवासी संख्या 32 ते 33 लाख आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT