मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर उस्मानाबादचे शेतकरी सुभाष देशमुख यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत या शेतकर्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला आहे. यामध्ये हा शेतकरी 15 ते 20 टक्के भाजल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
या कृत्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. अधिवेशन सुरू असताना एक शेतकरी विधान भवनापर्यंत येतो आणि आत्मदहनाचा प्रयत्न करतो, हे राज्याच्या दृष्टीने नामुष्की आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली. याप्रकरणी निवेदन करताना फडणवीस म्हणाले की, या शेतकर्याचे आणि त्याच्या भावाचे जमिनीवरून भांडण आहे. काही महिन्यांपूर्वी या भांडणातून त्याच्या वडिलांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्या जमिनीचा जो वाद आहे तो निकाली काढावा म्हणून अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत.