मुंबई : पुढारी वृत्तसेवा
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे दिले. छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू (बु) आणि हवेली तालुक्यातील तुळापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा बुधवारी वर्षा निवासस्थानी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, खा. डॉ. अमोल कोल्हे (दूरदृष्य प्रणालीद्वारे) आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे प्रतिबिंब हे स्मारक पाहणार्यांच्या मनात उमटावेत इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असे स्मारक असले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना सादर केल्या जाव्यात. त्या त्रिमितीय स्वरुपात सादर करण्यात याव्यात, असेही ठाकरे यांनी सांगितले.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी सादरीकरण केले. भीमा-भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी स्मारक साकारण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली. तुळापूर येथे आठ एकर तर वढू (बु) येथे सुमारे 4 एकर क्षेत्रावर स्मारक परिसर साकारण्यात येणार आहेत. शिखर समितीपुढे सादर केलेल्या आराखड्यात स्मारक परिसरात भव्य शिल्प, अॅम्फीथिएटर, प्रवेशद्वार, इमारत बांधकाम, घाट बांधकाम, संग्रहालय, प्रेक्षागृह, प्रकाश व ध्वनी शो, पायाभूत सुविधांतर्गत पाण्याच्या टाक्या, विद्युतीकरण, सौर ऊर्जा पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, संरक्षक भिंत याबरोबरच अस्तित्वातील समाधीचा जीर्णोद्धार आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.