मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या बारावी परीक्षेच्या गणिताच्या फुटलेल्या पेपरच्या आधी आणखी दोन पेपर फुटले असल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. 3 मार्चला गणिताचा पेपर फुटला होता. तर, त्या आधी 27 फेब्रुवारीला भौतिकशास्त्र आणि 1 मार्चला रसायनशास्त्राचा पेपर परीक्षेच्या एक तास आधी व्हॉटस्अॅपद्वारे परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना शेअर करण्यात आल्याचे पुरावे सापडले आहेत. तसेच, गणिताचा पेपर फुटल्यानंतरही जैवशास्त्राचा पेपर फुटला असल्याचे समजते. त्यामुळे याप्रकरणातील तपासाची व्याप्ती आणखी वाढली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बोर्डाच्या गणिताच्या पेपर फुटी प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. गुन्हेशाखेने अहमदनगरच्या मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयाच्या प्राचार्यांसह सहा जणांना अटक केली आहे. या महाविद्यालयातील शिक्षकांसह व्यवस्थापन कर्मचार्यांचे मोबाईल गुन्हेशाखेने जप्त केले असून या मोबाईलचा व्हॉट्सअॅप डेटा गुन्हे शाखेने मिळवला आहे. त्यातून गणिताच्या पेपरच्या आधी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आली. गणिताच्या पेपर फुटीचा तपास करत असतानाच दुसर्या दिवशी जैवशास्त्राचा पेपर फुटला असल्याचेही समोर आले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे अधिकारी याचा अधिक तपास करत आहेत.
बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्या एका महिलेच्या मोबाईलमध्ये दहावीच्या गणिताच्या पेपरचा फोटो आढळून आला. त्यामुळे पेपरफुटीचा हा प्रकार असल्याचा भरारी पथकाला संशय आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 13) घडला असून, संबंधित महिलेच्या मोबाईलमध्ये पेपरचे एक पान आढळून आले आहे. भरारी पथकाला माहिती मिळाल्यानंतर बुधवारी (दि. 15) तिचा मोबाईल त्यांनी तपासला त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे. भरारी पथकाचे प्रमुख किसन भुजबळ यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीषा संतोष कांबळे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकांना वर्गामध्ये जाता येत नाही. त्यांनी बाहेर सुरक्षेचे काम करायचे असते. असे असताना तिच्याकडे या पेपरचे पान कसे आले, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत. याप्रकरणी संबंधित ब्लॉकचे सुपरवायझर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.