पालघर ; सचिन जगताप : पाकिस्तान-ओखा सागरी सीमारेषेवर रविवारी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी सागरी सुरक्षा दलाने भारतीय मच्छीमार बोटीवर केलेल्या गोळीबारात पालघर तालुक्यातील वडराई गावचा श्रीधर चामरे हा खलाशी मृत्युमुखी पडला, तर गुजरातमधील एक खलाशी जखमी झाल्याची घटना घडली.
श्रीधर काम करत असलेली मासेमारी नौका जलपरी गुजरातच्या ओखा बंदर येथे मासेमारी करण्यास समुद्रात गेली होती. मासेमारी करत असताना पाकिस्तानी सागरी सुरक्षा दलाने भारतीय सागरी क्षेत्रात शिरकाव करून मासेमारी नौकेवर बेछूट गोळीबार केला. यात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील मच्छीमार श्रीधर रमेश चामरे (वय 30) यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे पालघर जिल्ह्यातील मच्छीमार गाव-वस्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पाकिस्तान सैनिकांच्या अमानवी कृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे. महाराष्ट्र व गुजरात सरकारने त्वरित पाऊले उचलून केंद्र सरकारच्या सहाय्ययाने श्रीधर चामरे यांचा मृतदेह सन्मानपूर्वक आणण्याची विनंती मच्छीमारांनी केली आहे.
ओखा येथील मरीन पोलिस स्थानकांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर घटनेची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती नौकेचे मालक जयंताभाई बोखामा यांनी दिली असल्याचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय यांनी दिली आहे.