नेवाळी : पुढारी वृत्तसेवा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमीपुत्रांचे लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी भूमिपुत्रांनी केली होती. मात्र भूमिपुत्रांना मागणी बाजूला सारत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी सिडको प्रशासनाला केली होती. त्यामुळे भूमिपुत्रांसह भूमिपुत्र शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. अखेर भूमिपुत्र शिवसेना नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भूमिपुत्र शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांच नाव देण्याची मागणी भूमिपुत्रांनी केली होती. यानंतर ठाणे, रायगड,पालघर,नाशिक,मुंबई मधील भूमिपुत्रांनी एकत्र येत विविध आंदोलन केली होती. या आंदोलनात सर्वाधिक कल्याण डोंबिवली परिसरातील 27 गावातील भूमिपुत्रांचा
समावेश होता. आंदोलनाची हाक समितीने देताच सर्व पक्षीय समित्यांच्या गावागावात बैठका होत होत्या. भोपर,भाल,मानपाडा,संदप, आडीवली, ढोकळी,सोनार पाडा आदी गावांमधून भूमिपुत्र हे रस्त्यावर उतरण्यासाठी अज्ज असत.या आंदोलनामध्ये साखळी आंदोलनाच्या वेळी देखील सर्वात मोठी साखळी आंदोलन 27 गावांमध्ये करण्यात आले होते. तर सिडकोला घेराव घालण्यासाठी बस, टेम्पो आणि आपल्या मालकीच्या वाहनांमधून भूमिपुत्रस आंदोलनात सहभागी झाले आहे. आज केलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा दिल्याने सध्या भूमिपुत्र आनंदित झाले आहेत. आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, माजी आमदार सुभाष भोईर यांच्यासह अन्य नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.या भेटी दरम्यानभूमिपुत्र नेत्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. यावेळी आपण एकीने दि.बा. पाटिल यांच्या नावासाठी आग्रही राहु असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भूमिपुत्र शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
18 गाव वगळून पालिका निवडणूक लावा, संघर्ष समितीची मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास पाठिंबा दर्शविल्याने 27 गाव संघर्ष समितीने आनंद व्यक्त केला आहे. दि. बा. पाटील हे 27 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष होते. पण त्यांची इच्छा होती की 27 गाव कल्याण-डोंबिवली
महानगरपालिकेतून वगळण्यात यावी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविल्यानंतर मुंबई,रायगड, ठाणे,पालघर, नाशिक जिल्ह्यातील भूमीपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कल्याण-डोंबिवलीमधील 27 गाव संघर्ष समितीने देखील याबद्दल आनंद व्यक्तस करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे. येत्या निवडणूकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवडणूक आयोगासोबत बोलून 27 गावांतील 18 गावे वगळून निवडणूक लावावी, अशी आमची मागणी असल्याचे संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी दैनिकपुढारीशी बोलताना सांगितले आहे
समितीचे सरचिटणीस पाटील म्हणाले, दि. बा. पाटील हे संघर्ष समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळातच विलासराव देशमुख यांनी 27 गावाच्या ग्रामपंचायती स्थापन केल्या होत्या. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्याचबरोबर आमची मुख्यमंत्री ठाकरे यांना एक विनंती आहे की, दोन वर्षांपूर्वी 18 गावांची स्वतंत्र नगरपालिका घोषित केली होती.
सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासोबत बोलून हि 18 गाव वगळून पालिकेची निवडणूक लावावी, अशी आमची मागणी आहे. हा निर्णय झाल्यास दि. बा. पाटील यांना ती एक आदरांजली ठरेल असे देखील पाटीलम्हणाले आहेत