मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीबनगर झोपडपट्टीमधील अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारीही हातोडा मारला असून 100 टक्के तोडक कारवाई पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. तसेच येथील अधिकृत 100 घरांच्या तळघरावरचे अनधिकृत मजले मशीनचा वापर न करता हाताने पाडले जात आहेत. त्याची ही 50 टक्के कारवाई पूर्ण झाली आहे.
शनिवार संध्याकाळपासून येथे मोकळ्या झालेल्या जागेची स्वच्छता करून कंपाऊंड घालण्याचे काम रेल्वेकडून हाती घेतले जाणार आहे. 19 मे पासून गरीब नगरमधील 500 अनधिकृत झोपडपट्टीधारकांवर रेल्वे प्रशासन, पालिका आणि पोलिसांकडून संयुक्त तोडक कारवाई सुरू आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात घरांसाठी वापरलेल्या लाकडी फळ्या व लोखंडी पत्रे यांचे अस्ताव्यस्त ढीग जमा झाले आहेत.
सध्या सिमेंट आणि विटांचे डेब्रिज हलविण्याचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारपर्यंत हे डेब्रिज पूर्णपणे हलवले जाणार असून संध्याकाळी मोकळ्या झालेल्या जागेला संरक्षण कंपाउंड उभारले जाणार आहे. तसेच येथे राहत असलेल्या निष्कासित झोपडपट्टीधारकांकडून पुन्हा येथे घरे बांधली जाऊ नयेत यासाठी विशेष काळजी रेल्वे प्रशासन घेणार असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, शुक्रवारी येथील कारवाईत तोडलेल्या धार्मिक स्थळावर अल्पसंख्यांक बांधवांकडून सामूहिक नमाज पठण केले जाणार असल्याची अफवा या परिसरात होती. त्यामुळे रेल्वेने जास्तीचा पोलीस फौजफाटा येथे तैनात केला होता. मात्र येथील नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे येथे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.