नवी मुंबई : शहराला बारा महिने 24 तास पाणीपुरवठा करणारी महापालिका अशी ओळख असलेल्या नवी मुंबई महापालिकेनेही शुक्रवारी शहरात दहा टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. सोमवार 25 मेपासून ही कपात लागू होणार आहे.
आठही विभागात आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाय सिडको नोडमधील खारघर व कामोठे येथे मोरबे धरणातून होणारा पाणीपुरवठा दर शुक्रवारी पूर्णपणे बंद राहणार आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोरबे आणि बारवी धरणातून दैनंदिन पाणीपुरवठा करण्यात येतो. मोरबे धरणात सद्यस्थितीत प्रत्यक्ष 36.470 द.ल.घ.मी. (19.11%) इतका उपयुक्त जलसाठा आजअखेर उपलब्ध आहे.
हा साठा सद्यस्थितीत शहरासाठी पुरेसा आहे. मात्र अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता असल्याने पुढील वर्षाची गरज पाहून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वरील पाणीकपात ही मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयामधील उपयुक्त जलसाठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत लागू राहणार आहे.
आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवून पाणी बचत करण्याचे महानगरपालिकेमार्फत नियोजित आहे. महापालिकेच्या आठही विभागात आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ही 10 टक्के पाणीकपात सोमवार, दि. 25 मेपासून अंमलात येईल. सिडको नोड मधील खारघर व कामोठे येथे मोरबे धरणातून होणारा पाणी पुरवठा दर शुक्रवारी पूर्णपणे बंद राहणार आहे.
दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद
बेलापूर : सोमवार व गुरुवार
नेरूळ : मंगळवार व शनिवार
तुर्भे : बुधवार व रविवार
वाशी : गुरुवार व सोमवार
कोपरखैरणे : मंगळवार व शनिवार
घणसोली : बुधवार व रविवार
ऐरोली : शुक्रवार (म.औ.वि.मं.यांच्या गुरुवार व शुक्रवारच्या संभाव्य शटडाऊननुसार)
दिघा : म.औ.वि.मं.च्या संभाव्य शटडाऊननुसार
पनवेल : देहरंग धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पनवेल महापालिकेनेही शहरात पाणीकपात जाहीर केली आहे. सोमवारपासून जलकुंभनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
पनवेल शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तसेच देहरंग धरण या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व एमआयडीसीकडून पाणीपुरवठा कमी झाल्याने शहराची दररोजची गरज भागविण्यासाठी देहरंग धरणातील अतिरिक्त पाणीसाठ्याचा वापर सुरू केला आहे.
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे तसेच पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या दिवशी आवश्यक त्या प्रमाणात पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
उपलब्ध पाणीसाठा कमी
धरणातील उपलब्ध पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा पुरेसा उपलब्ध होईपर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.