Mumbai News Pudhari
मुंबई

Mumbai News: वडाळा पुनर्विकासावर अखेर पालिकेची मोहोर; प्रस्ताव बहुमताने मंजूर

प्रस्तावाच्या बाजून 112 तर विरोधात 79 मते

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मागील आठवड्यात बहुमताअभावी नामुष्की पत्करावी लागल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपा शिवसनेने शुक्रवारी तयारीनिशी वडाळा पुनर्विकासाचा प्रस्ताव सभागृहात आणत बहुमताच्या जोरावर अखेर मंजूर करून घेतला. प्रस्तावाच्या बाजूने 112 तर विरोधात 79 मते पडली.

वडाळा गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्ताव 30 एप्रिलला महापालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. यावेळी तातडीचे कामकाज म्हणून महापौर रितू तावडे यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न केला.

परंतु विरोधकांनी मतदानाची मागणी केली. यावेळी महापौरांनी बहुमत आहे की नाही, याची शहानिशा न करता मतदानाला परवानगी दिली. यात सत्ताधाऱ्यांना उपस्थित नगरसेवकांच्या तीन चतुर्थांश मतदान न झाल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली होती. शुक्रवारी महापालिका सभागृहात नियमित कामकाज म्हणून पुन्हा वडाळा गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला.

कोणताही धोका नको यासाठी भाजपाने नगरसेवकांना अगोदरच व्हीप काढला होता. त्यामुळे सर्व सत्ताधारी नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. त्यामुळे या प्रस्तावावर विरोधकांनी मतदानाची मागणी करताच महापौर रितू तावडे यांनी ती मान्य केली. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली.

अनुकूल व प्रतिकूल असे दोन अर्ज बनवून उपस्थित नगरसेवकांना सभागृहबाहेर जाऊन सही करून मतदान नोंदवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेची मत मोजणी झाली असता, यात अनुकूलच्या बाजूने म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने 112 मते पडली. तर विरोधकांच्या बाजूने 79 मते पडली. त्यामुळे प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्याचे महापौर यांनी जाहीर केले.

मतदानाची घोषणा होताच सभागृहाचे सर्व दरवाजे बंद

मतदानाची सभागृहात घोषणा करतात सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. घोषणेच्या वेळी जेवढे नगरसेवक सभागृहात उपस्थित असतील त्यांनाच मतदानाचा अधिकार होता. बाहेरील नगरसेवक आत येऊ नये म्हणून मतदान प्रक्रिया जेथे पार पडली तेथील दरवाजे बंद करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

सत्ताधाऱ्यांचे 9 तर विरोधकांचे 26 नगरसेवक गैरहजर

मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 नगरसेवकांना मतदानाचा अधिकार आहे. परंतु भाजपाच्या नगरसेविका नका केरकर यांचे निधन झाल्यामुळे सभागृहात 226 नगरसेवक आहेत. या सत्ताधारी भाजपा शिवसेनेचे 121 तर विरोधकांचे 105 नगरसेवक आहेत. पण मतदान प्रक्रियेच्या वेळी सत्ताधारी पक्षाचे 9 नगरसेवक व विरोधकांचे 26 नगरसेवक अनुपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT