Vasai Virar Heavy Rain Pudhari
मुंबई

Vasai Virar Heavy Rain: कामावर गेले कसेबसे मात्र रात्र काढली स्थानकात; विरार-नालासोपाराकरांची संततधार पावसाने घेतली परीक्षा

चार दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे या सर्वांना रेल्वे स्थानकावरच रात्रभर मुक्काम करावा लागला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: काही ठिकाणी कंबरेइतके, तर काही ठिकाणी गुडघाभर पाण्यातून प्रवास, रखडलेल्या लोकल रेल्वे, रुळावर आलेले पाणी ही सर्व संकटे झेलत विरार-नालासोपाराकर कसेबसे कामाच्या ठिकाणी पोहोचले पण काम संपल्यानंतर त्‍यांना घर गाठणे शक्य झाले नाही. चार दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे या सर्वांना रेल्वे स्थानकावरच रात्रभर मुक्काम करावा लागला.

विरार-वसई शहरांमध्ये शनिवारपासून ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. त्‍याचा फटका शहरात राहणार्‍या व्यावसायिकांना बसलाच, शिवाय कामासाठी मुंबईकडे जाणार्‍या नागरिकांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागला. घरी परतताना तर त्‍यांचे आणखी हाल झाले.

चर्चगेट ते भाईंदरपर्यंत सुसाट येणारी लोकल वसईपर्यंत कशीबशी येत होती. अनेक लोकलची वसई ते भाईंदरपर्यंत रांग लागली होती. त्‍यामुळे अनेक जण भाईंदर खाडीवर अडकून पडले. तर काहीजण स्टेशनवर अडकले.

ट्रॅकमध्ये पाणी आल्यामुळे वसईच्या पुढे लोकल जाणार नसल्याची अनाउन्समेंट करण्यात येत होती. त्यामुळे वसईला जाऊन पुढे गाडीने घर गाठता येईल, असे अनेकांना वाटले. पण वसईला आल्यावर ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे एकही रिक्षावाला अथवा गाडीवाला कुठेही जायला तयार नव्हता.

त्यामुळे अनेकांनी स्टेशनमध्ये थांबायचे ठरवले. त्यामुळे रेल्वे स्टेशनही खचाखच प्रवाशांनी भरून गेली होती. वसई परिसरातील हॉटेलमध्ये पोहचणे अनेकांना शक्य नसल्यामुळे वसई ते चर्चगेट जाणाऱ्या लोकलमधून काहीजण भाईंदरला जाऊन हॉटेलमध्ये राहिले.

उजाडताच ट्रॅकवरून चालण्यास सुरुवात

बुधवारी सकाळी वसई ते विरार लोकल सेवा धीम्या गतीने सुरू झाली. परंतु रात्रभर स्टेशनवर बसलेल्या प्रवाशांनी पहाट होताच ट्रॅकवरून चालायला सुरुवात केली. वसई येथून अडीच ते तीन तास प्रवास करत, नालासोपारा व विरारचे नागरिक आपल्या घरी पोहचले. पण घरी जातानाही त्यांना दोन ते तीन फूट पाण्यातूनच जावे लागले.

महिलांचे हाल

रेल्वेने वसई स्टेशनला उतरलेल्या महिलांचे हाल झाले. पाऊस सुरू असल्यामुळे स्टेशनवर उभे राहण्यासाठीही नीट जागा नव्हती. त्यामुळे कुठेतरी आडोसा बघून या महिला सकाळी ट्रेन सुरू होईपर्यंत स्टेशनवर ताटकळत उभ्या होत्या. रेल्वे स्टेशनवरील शौचालय घाणेरडे असल्यामुळे महिला प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

वडापाववर काढली रात्र !

प्रवाशांनी वडापाव खाऊन मंगळवारची रात्र स्टेशनवर काढली. यावेळी काही सामाजिक संस्थांनी खिचडी व पाण्याचे वाटप केल्यामुळे थोडाफार पोटाला आधार मिळाला. रेल्वे स्टेशनवरील स्टॉल उशिरापर्यंत सुरू ठेवून, प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT