Navi Mumbai Vegetable Prices pudhari photo
मुंबई

Navi Mumbai Vegetable Prices : भाजीपाल्याच्या दरात घसरण

सर्वसामान्य ग्राहकांना, विशेषतः गृहिणींना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : श्रावण महिन्यात भाजीपाल्याची मागणी वाढलेली असतानाच वाशीतील घाऊक भाजीपाला बाजारात आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या घाऊक बाजारात बहुतांश भाज्या २० ते ४० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. त्याचा परिणाम किरकोळ बाजारावरही झाला असून, बहुतेक भाज्या ६० ते ८० रुपये किलो दरात मिळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना, विशेषतः गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

सध्या घाऊक बाजारात लाल भोपळा आणि कोबी ६ ते १० रुपये किलो दराने विकले जात आहेत.फ्लॉवर आणि दुधी भोपळा १२ ते १८ रुपये, पडवळ १६ ते २० रुपये, तर चवळी शेंग, ढेमसे, काकडी, ढोबळी मिरची, शिराळी आणि दोडकी २० ते ३० रुपये किलो दरात आहेत. फरसबी, घेवडा आणि गवार ३० ते ४० रुपये किलोवर आले आहेत.

भेंडी २४ ते ३० रुपये, वांगी २० ते ३० रुपये, तर सुरण २४ ते २८ रुपये किलो दराने उपलब्ध आहे. टोमॅटोचे दरही यंदा पावसाळ्यात नियंत्रणात आहेत. टोमॅटो १६ ते २० रुपये किलो दरात मिळत असून, गावठी आणि बंगळुरू टोमॅटोची आवक चांगली आहे.

हिरवी मिरचीही ३० ते ४० रुपये किलोवर आली आहे. मागील महिन्यात १५० ते २०० रुपये किलो असलेला हिरवा मटार आता घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये, तर किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो दरात मिळत आहे.

नारळ महागले!

यंदा नारळाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने नारळाच्या दराने उच्चांक गाठला आहे. सध्या किरकोळ बाजारात एक नारळ ग्राहकांना ४० ते ४५ रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. यंदा नारळाच्या उत्पादनात तब्बल ५० टक्के घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोकणात वर्षातून दोन ते तीन वेळा नारळाचे उत्पादन घेतले जाते. परंतु, गतवर्षी वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे फळधारणा कमी प्रमाणात झाली. त्याचा थेट परिणाम यंदाच्या उत्पादनावर झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT