मुंबई

वंचित बहुजन आघाडीचा अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात धडक मोर्चा!

अमृता चौगुले

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : वंचित बहुजन आघाडीचा अदानी इलेक्ट्रिसिटी पॉवरकडून दरवाढ आणि वाढीव वीजबिले पाठवून केल्या जाणाऱ्या आर्थिक लुटीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने धरणे आंदोलन केले. युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात उपनगरातील जनतेची लूट थांबवावी, अदानी ऐवजी बेस्ट ची सेवा उपलब्ध करावी आणि वाढीव बिले ५०% माफ करावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

यावेळी आंदोलनाला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, "अदानीच्या वीज मीटरमध्ये दोष आहे, तर याचे नुकसान जनतेनी का भरावे? आधी वीज मीटर सरकार स्वतः सगळी प्रक्रिया करून घरी मिटर फिट करून देत होते पण, आता अदानी इलेक्ट्रिसिटी आल्यापासून लोकांना ना हरकत प्रमाणपत्र स्वतः आणून स्वतः मीटरसाठी अदानी पॉवर कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहे. आम्ही तुमचे गुलाम नाहीत. अदानीकडून मीटर काढून बेस्टकडे परत इलेक्ट्रिसिटी मीटर देण्यात यावे, असे सुजात आंबेडकर म्हणाले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन, महासचिव आनंद जाधव, वंचित बहुजन युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष प्रविण रणशुर, मुंबई प्रदेश मुस्लिम आघाडीचे अध्यक्ष दौलत खान, वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्षा सुनिताताई गायकवाड, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, "बेस्ट असताना शंभर युनिट्सकरिता जेव्हढे बिल यायचे आता अदानीमार्फत त्याच्या दुप्पट बिल येतं. आरे कॉलनीमध्ये मिटर लावण्यासाठी सीईओकडे ना हरकत प्रमाणपत्र करिता जावे लागते. यांच्या बेशिस्त वागण्यामुळे आरे कॉलनीतील ६० टक्के लोकांच्या घरी अद्याप मीटर नाही. अदानी पावरने  लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील सिद्धार्थ नगर भागात जवळपास 5 हजार गरीब लोकांचे कनेक्शन बंद केले होते. 2018 मध्ये अदानीचे मीटर जास्त बिल देत होते यांचे मीटर गंडले तर सामान्य लोकांनी जास्त पैसे का द्यायचे ? अदानी कंपनी सांगते तापमान वाढले म्हणून बिल वाढते. तुम्ही आमच्या घरी स्मार्ट मीटर लावले का थर्मामीटर लावले? याचं उत्तर त्यांनी द्यावे.

अदानी पावरच्या काळात लोकांचे वीज बिलाच्या तक्रारीत दुप्पट वाढ झाली आहे. नरेंद्र मोदी- अमित शहा देश विकायला निघाले आहेत, आपल्याला देश विकण्यापासून थांबवायचा आहे. नरेंद्र मोदी पब्लिक सेक्टर अदानीच्या घशात घालताय. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर नेहमी म्हणातात की, मोदी हा देश दारुड्या सारखा विकायला लागलेय. राहुल गांधी संसदेत अदानी आणि मोदींचा फोटो दाखवतात पण, त्यांचे मित्र असलेले शरद पवार यांचा अदानी सोबतचा सिल्वर ओक, गच्चीवरचा फोटो का दाखवत नाही ?

आमची प्रमुख मागणी आहे की, जे वाढीव बिलं दिलेले आहेत ते त्यामध्ये जनतेला ५० % सूट द्यावी !वंचित बहुजन आघाडी जेव्हा मुंबई महापालिकेत जाईल, तेव्हा अदानीच्या ह्या कारभाराला उचलून आम्ही मुंबईच्या बाहेर फेकून देऊ! आम्ही महापालिकेत सत्तेवर आलो तर जनतेला १०० युनिट पर्यंतच वीज बिलं मोफत करू अदानींनी जे वाढीव बिलं दिले आहेत त्यांना आम्ही फाडून निषेध करतो! यावेळी अदानी मीटर ची प्रतीकात्मक दहीहंडी थर लावून फोडण्यात आली. मोठ्या संख्येने मुंबईकर या आंदोलनात सहभागी झाले होते.

SCROLL FOR NEXT