Utkarsh Paryavaran Wari 2026 Pudhari
मुंबई

Utkarsh Paryavaran Wari 2026: सलग तिसऱ्या वर्षी 'उत्कर्ष पर्यावरण वारी २०२६' यशस्वी; पर्यावरण संवर्धनासह महिला सक्षमीकरणाचा संदेश

प्लास्टिकमुक्त वारीचा संकल्प; उत्कर्ष पर्यावरण वारीतून ५ लाख कापडी पिशव्या, ५ लाख स्टील बाटल्यांचे वाटप

पुढारी वृत्तसेवा

उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे आयोजित 'उत्कर्ष पर्यावरण वारी २०२६' हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीरित्या पार पडला. २०२४, २०२५ आणि २०२६ या तीन वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

वारीदरम्यान 'प्लास्टिकमुक्त वारी', 'एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार' आणि 'स्वच्छ वारी – हरित वारी' या संदेशांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली. स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवत पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून वारकऱ्यांपर्यंत पोहोचविला.

या उपक्रमांतर्गत ५ लाख कापडी पिशव्या आणि ५ लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, या कापडी पिशव्या उत्कर्षच्या महिला सक्षमीकरण प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या १,००० हून अधिक महिलांनी तयार केल्या. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच महिलांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले.

यावेळी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष ॲड. दगडू लोंढे म्हणाले, "वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि सामाजिक एकतेची अमूल्य परंपरा आहे. या परंपरेला पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरणाची जोड देत समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

'उत्कर्ष पर्यावरण वारी' ही केवळ मोहीम नसून पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण आणि लोकसहभाग यांचा प्रभावी संगम आहे. यंदा ५ लाख कापडी पिशव्या आणि ५ लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करून प्लास्टिकमुक्त वारीचा संदेश लाखो वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला."

ते पुढे म्हणाले, "महिला सक्षमीकरण प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांमुळे त्यांना सन्मानजनक व शाश्वत रोजगाराची संधी मिळाली. समाज, शासन, स्वयंसेवक, दाते आणि वारकरी यांच्या विश्वास व सहकार्यामुळे हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीरित्या पूर्ण झाला.

'सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी' या मूल्यांवर विश्वास ठेवत उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन भविष्यातही पर्यावरणपूरक, स्वावलंबी आणि सक्षम भारत घडविण्यासाठी अशाच लोकहिताच्या मोहिमा सातत्याने राबवत राहील."

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंढरपूर नगरपरिषद, पोलीस प्रशासन, स्वच्छता कर्मचारी, दाते, स्वयंसेवक, वारकरी, भाविक आणि सर्व सहकाऱ्यांचे फाउंडेशनतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच "सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी" या ध्येयाने प्रेरित उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवत राहणार असल्याचे संस्थेने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT