मुंबई: मुंबईसह राज्यभरात निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पावसाने निर्माण झालेली आपत्ती ही नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे, अशा शब्दात ठाकरेंनी सरकारवर हल्ला चढवला. दरम्यान, बर्याच दिवसांनी हवामानाचा अंदाज खरा ठरल्याबद्दल त्यांनी वेधशाळेलाही टोला लगावला.
नांदेडमधील शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते केशवराव धोंडगे यांचे सुपुत्र पुरुषोत्तम धोंडगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ठाकरेंनी राज्यातील पूरपरिस्थितीवरून सरकारला जबाबदार धरले. मुंबईमध्ये नवीन नवीन ठिकाणी पाणी तुंबत आहे.
विमानतळावरील पाणी साचल्याचे फोटो येत आहेत. त्यामुळे आता तेथे बंदर करायची गरज नाही. जहाजेपण तिथेच येतील आणि विमाने पण तिथे येतील, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अदानींवरही निशाणा साधला. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील 11 गावांचे पुनर्वसन न करता तेथे धरणाचे काम सुरु केल्यामुळे मानवनिर्मित आपत्ती आल्याचा आरोपही त्यांनी केला. गावकर्यांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने केले असते तर कोणाला जीव गमवायची वेळ आली नसती, असेही ठाकरे म्हणाले.
चोर बाजारात माणसे दिसेनाशी झाली
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, राजकारणामध्ये सध्या जो काही धुमाकूळ घातला जातोय, इथे माणूसच दिसेनासा झाला आहे. सगळे चोर दिसत आहेत. कोणी पैसे चोरतोय, कुणी मत चोरतोय, कुणी पक्ष चोरतोय...या सगळ्या चोरबाजारामध्ये माणसे दिसेनाशी झाली आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला.