Uddhav Thackeray vs Eknath Shinde file photo
मुंबई

Uddhav Thackeray : ‘शिवसैनिक खचलेला नाही, गद्दारांना गाडण्यासाठी पेटलेला आहे!’ : उद्धव ठाकरेंचा घणाघात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ‘शिवसेना कधीही काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. संकटं तर येत-जात राहतात, पण संकटाला पुरून उरणारा खरा शिवसैनिक आजही माझ्यासोबत पाय रोवून उभा आहे. आमचा शिवसैनिक खचलेला नाही, तर तो अन्यायाविरुद्ध पेटून उठला आहे,’ अशा कडक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक षण्मुखानंद सभागृहात आयोजित भव्य मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि बंडखोर खासदारांवर चौफेर आणि अत्यंत टोकदार शब्दांत प्रहार केला.

आम्ही सत्तेसाठी नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली!

सभागृहात उपस्थित जनसागराला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, तर सत्ता आमच्यासाठी जन्माला आली आहे. ज्यांना सत्तेची हाव होती ते सोडून गेले. पण लक्षात ठेवा, येत्या काळात 'मिंधेसेना' स्वतःचे अस्तित्व गमावून महाराष्ट्र भाजपमध्ये विलीन होईल.’’ भाजपवर टीका करताना ते पुढे म्हणाले, ‘‘आज आमच्या डोक्यावर उपरे आणून बसवले गेले आहेत. पण लोकसभा निवडणुकीने जागा दाखवून दिली आहे; आज संसदेत भाजपचे स्वतःचे बहुमत राहिलेले नाही.’’

'मी लोकांना भेटत नव्हतो, तर मग ९ खासदार निवडून कसे आले?'

बंडखोर खासदारांनी केलेल्या जुन्या आरोपांचा समाचार घेताना ठाकरेंनी थेट सवाल केला, ‘‘मी लोकांना भेटत नव्हतो, घरात बसून होतो, असा आरोप माझ्यावर केला गेला. जर मी लोकांना भेटत नव्हतो, तर मग यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचा एकही चेहरा न वापरता माझे ९ खासदार कसे निवडून आले?’’

ते पुढे म्हणाले, ‘‘मी शिवसेनेची सुरुवातीपासूनची वाटचाल स्वतः पाहिली आहे. मी आज सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक आहे, शिवसेनेचा पहिला नारळ मीच फोडला होता. ज्यांना सर्वकाही दिले, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. 'मातोश्री'ने यांना वाढवायचे आणि यांनी फक्त स्वतःचे उखळ पांढरे करायचे, हे आता चालणार नाही.’’

दुसऱ्यांचे बाप चोरणाऱ्यांच्या रक्तात भेसळ कशी आली?

एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावताना उद्धव ठाकरे भावूक आणि आक्रमक झाले. ते म्हणाले, ‘‘आज काही जणांना स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी दुसऱ्यांचे बाप चोरावे लागत आहेत. स्वाभिमान असलेल्या शिवसैनिकाच्या रक्तात अशी गद्दारीची भेसळ कशी काय येऊ शकते? आजही काही जण 'मातोश्री'च्या वैभवावर आणि लोकप्रियतेवर जळत आहेत. जर तुम्ही स्वतःला खरे सिद्ध केले आहे, तर मग आता परत फोडाफोडीचे राजकारण कशासाठी करताय?’’

इतिहास गद्दारांना कधीही माफ करणार नाही!

महाराष्ट्राच्या इतिहासाचा दाखला देत ते म्हणाले की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही गद्दार होते. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही आपल्या कार्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंनाही असाच त्रास दिला गेला, पण जुन्या कुप्रथा आणि परंपरा मोडीत काढण्यासाठी प्रबोधनकार नेहमी खंबीरपणे उभे राहिले. आज माझ्यावर, माझ्या पत्नीवर आणि आदित्यवरही आरोप केले जात आहेत. पण आम्ही डगमगणार नाही,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मतदारांची माफी आणि देणगीचा स्पष्ट इशारा

लोकसभा निवडणुकीत काही जागांवर झालेल्या चुकांबद्दल मोठ्या मनाने बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मी महाराष्ट्रातील मतदारांची जाहीर माफी मागतो, कारण मागच्या वेळी आमच्याकडून जे चुकीचे लोक निवडून दिले गेले, त्यांनी जनतेचा विश्वासघात केला.’’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT