Uddhav Thackeray Ram Raksha Andolan: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या देणगी निधीच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेल्या देणगीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी 'राम रक्षा आंदोलन' सुरू करण्याची घोषणा केली. या आंदोलनाची सुरुवात रविवार, 5 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता दादर येथील मारुती मंदिराजवळ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिर हा केवळ धार्मिक विषय नसून लाखो हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. या श्रद्धेशी कुणीही खेळ करू नये. राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असताना सत्य जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी यांनी 'अब हिंदू मार नहीं खाएगा' असे म्हटले होते. आज मी एवढेच म्हणेन की, 'अब हिंदू माफ नहीं करेगा.' रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी आता जनतेला उत्तर द्यावे लागेल."
राम मंदिरासाठी जमा झालेल्या पैशांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. "राम मंदिराच्या नावावर लोकांनी श्रद्धेने देणग्या दिल्या. मात्र आता या निधीबाबत संशय निर्माण झाला आहे. काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार या पैशांचा वापर राजकीय हेतूंसाठी, पक्ष फोडण्यासाठी किंवा सत्तेचे राजकारण करण्यासाठी होत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी," असे ते म्हणाले.
राम मंदिर आंदोलनात शिवसैनिकांनीही मोठा सहभाग घेतल्याची आठवण करून देताना ठाकरे म्हणाले की, त्या काळात अनेक हिंदूंनी संघर्ष केला होता. त्या भावनांचा वापर करून भाजपने राजकीय फायदा घेतला आणि आज त्याच राम मंदिराच्या नावावर प्रश्न निर्माण झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
राम मंदिर निधीबाबत सत्य बाहेर यावे आणि जबाबदारांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी राज्यभरातील रामभक्तांनी रविवारी दादरमधील मारुती मंदिराजवळ एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. या आंदोलनाला 'राम रक्षा आंदोलन' असे नाव देण्यात आले असून, रामभक्तांच्या श्रद्धेचे संरक्षण करण्यासाठी हा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राम मंदिर निधीबाबतचे आरोप, त्यावरील चौकशी आणि उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप यावर संबंधित यंत्रणा किंवा भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.