मुंबई: टाटा समूहाच्या मालकीच्या ‘एअर इंडिया’ कंपनीने आपल्या सर्व वैमानिकांची नशाविरोधी चाचणी सुरू केली आहे. प्राथमिक तपासणीमध्ये आणखी दोन वैमानिकांचे चाचणी निकाल ‘नॉन नेगेटिव्ह’ (संशयास्पद) आले आहेत. या दोन्ही वैमानिकांना ड्युटीवरून तातडीने हटवण्यात आले असून त्यांचे नमुने अंतिम निश्चितीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
४ ऑगस्ट रोजी फुकेत येथून दिल्लीला येणाऱ्या ‘एआय २३७९’ या विमानाला अचानक हवेत तीव्र हेलकावे बसले. या दरम्यान विमान तब्बल ३०० फूट (९१ मीटर) खाली घसरले. विमानात १३७ प्रवासी आणि ८ कर्मचारी असे एकूण १४५ जण होते.
त्यापैकी किमान २४ प्रवासी जखमी झाले. या घटनेनंतर मुख्य वैमानिकाची वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या अंतिम चाचणीत गांजा (मॅरिझुआना) सेवन केल्याचे निष्पन्न झाले होते. या धक्कादायक घटनेनंतर १३ ऑगस्टपासून एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नियमांपेक्षाही कठोर पावले उचलत सर्व वैमानिकांसाठी ‘सायकोॲक्टिव्ह’ पदार्थांची चाचणी अनिवार्य केली.
दोन्ही कंपन्यांमध्ये पाच हजारहून अधिक वैमानिक कार्यरत असून आतापर्यंत सुमारे ४०० वैमानिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. उड्डाण सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ही व्यापक तपासणी मोहीम अधिक वेगाने राबवली जात आहे.