नवी मुंबई : नवी मुंबईतील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या टीटीसी एमआयडीसी परिसराचे रूप पालटण्यासाठी विविध सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये महापे ते रबाळे या मुख्य मार्गाचे सुशोभीकरणही करण्यात आले असून पदपथांची दुरुस्ती, संरक्षक रेलिंग, आकर्षक रंगरंगोटी, रस्त्यालगत हिरवळ व दुभाजकांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. यामुळे या मार्गाला आधुनिक व देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे.
टीटीसी एमआयडीसी परिसरातून दररोज हजारो कर्मचारी, उद्योजक, व्यावसायिक तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. त्यामुळे या परिसरात सुरक्षित, स्वच्छ आणि आकर्षक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने सुशोभीकरण करण्यात आले आहे. महापेहून रबाळेकडे जाणाऱ्या मार्गावरील खराब झालेल्या पदपथांची दुरुस्ती करून त्यांना नव्याने आकार देण्यात आला आहे.
पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत रेलिंग बसवण्यात आले असून संपूर्ण परिसरात आकर्षक रंगसंगतीत रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याचे सौंदर्य अधिक खुलून गेले आहे.
रस्त्याकडेला असलेल्या मोकळ्या पट्ट्यांमध्ये विविध प्रकारची शोभेची झाडे, फुलझाडे आणि हिरवळ विकसित करून छोटेखानी उद्यानाची संकल्पना साकारण्यात आली आहे. यामुळे परिसरात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे. तसेच रस्त्याच्या दुभाजकांमध्येही आकर्षक लँडस्केपिंग आणि सुशोभीकरणाची कामे करण्यात आल्याने संपूर्ण मार्ग अधिकच देखणा आणि व्यवस्थित दिसत आहे.
याशिवाय प्रवाशांना बसण्यासाठी बाकडेही बसवण्यात आले आहेत. महापे जंक्शनच्या सुशोभीकरणाचे कामही सध्या प्रगतीपथावर असून ते पूर्ण झाल्यानंतर या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या जंक्शनला आधुनिक स्वरूप देण्याचे काम वेगाने सुरू असून, यामुळे परिसराची ओळख अधिक उठावदार होणार आहे. औद्योगिक क्षेत्राचा विकास हा केवळ उद्योगांपुरता मर्यादित न राहता त्या परिसराचे सौंदर्य, स्वच्छता आणि पर्यावरण यांनाही तितकेच महत्त्व दिले जात असल्याचे या कामांमधून दिसून येत आहे.
सुशोभीकरणामुळे टीटीसी एमआयडीसी परिसराची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार असून येथे येणारे उद्योजक, कर्मचारी आणि नागरिकांनाही अधिक सकारात्मक अनुभव मिळणार आहे.