पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर भारतातून येणारे थंड वारे अन् दक्षिण भारतातून येणारे बाष्पयुक्त वाऱ्याच्या प्रभावामुळे ऐन थंडीत राज्यात पर्जन्यस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गुरूवार २६ आणि शुक्रवार २७ डिसेंबर रोजी राज्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटल्याचे वृत्त डॉ.के.एस. होसाळीकर यांनी दिले आहेत.
पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ.होसाळीकर यांनी एक्स पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "गुरूवार २६ आणि शुक्रवार २७ डिसेंबर रोजी राज्यात मेघगर्जनेसह🌩⛈️ पावसाची शक्यता आहे. गुरूवारी (दि.२६) धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तर शुक्रवारी (दि.२७) अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे".
उत्तर भारताकडून थंड वारे अन् दक्षिणेतून येणारे बाष्पयुक्त वारे यांची टक्कर राज्यावर होत आहे. त्यामुळे वरच्या थरांत झोतवारा (जेट स्ट्रीम विंड) वेगाने वाहत आहे. हे वारे वातावरणाच्या खालच्या थरांतही येत असल्याने राज्यात बोचरे वारे, दाट धुके अन् पावसाचे वातावरण तयार झाले असून बुधवारपासून चार दिवस काही भागांत हलक्या सरींचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात मात्र उत्तर व दक्षिण भागातून येणार्या वार्यांची टक्कर होत असल्याने विचित्र वातावरण तयार झाले आहे. तापमानात वाढ होऊनही वरच्या थरातील वारे, दाट धुके अन् पाऊस असे वातावरण 25 ते 29 पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सध्या धुळे, नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यात इतर भागातही पाऊस वाढण्याचा अंदाज आहे.
तीन ते चार दिवसांपासून राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. किमान तापमानाचा सरासरी पारा 9 ते 10 वरून 18 ते 22 अंशांवर गेला. तरीही गारठा जाणवत आहे. याचे कारण झोतवार्याचा वाढलेला प्रभाव हे आहे. उत्तर भारत गारठला असून जम्मू-काश्मीर ते मध्य प्रदेशपर्यंतची राज्ये गारठली आहेत.
राज्यात उत्तर भारतातून शीतलहरी येत आहेत तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारेही येत आहेत. या दोन्ही वार्याची टक्कर होत आहे. त्यामुळे हवेच्या वरच्या थरात झोतवारा (जेट स्ट्रीम विंड) तयार होत आहे. समुद्रसपाटीपासून 20 ते 50 हजार कि.मी. अंतरावर ही प्रक्रिया होत आहे. त्याचा परिणाम हवेच्या खालच्या थरांत जाणवत आहे. बोचरे वार सतत वाहत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होऊनही थंडी जाणवत आहे. तसेच पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.