The three parties in the Mahayuti have decided to contest the upcoming local body elections together
गौरीशंकर घाळे, मुंबई
एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत, असे म्हणतात. भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी बहुदा ही प्रघात म्हण मोडीत काढायचा चंग बांधला असावा. दोन कशाला, एका म्यानात तीन तलवारी आणि छोटे-मोठे खंजीर, पाती वगैरे सामावून घेण्याचा त्यांचा मानस असावा.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार, असा निर्धार जेव्हा भाजप नेते बोलून दाखवतात तेव्हा एका म्यानात काय काय बसवणार, हा प्रश्न स्वाभाविक बनतो.
स्थानिक निवडणुका एकत्र लढायच्या याचा अर्थ महायुती नावाच्या म्यानात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन तलवारी ठेवायच्या. जोडीला आरपीआय, रयत वगैरे छोट्या-मोठ्या पातीही बाळगायच्या, असाच सारा हा मामला आहे. एका म्यानात तीन तलवारी आणि असंख्य छोट्या पाती बाळगत महायुतीने एकत्रित निवडणुका लढविल्यास निकाल काय लागतील ते सांगता येणार नाही. मात्र, एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, हा वाकप्रचार मात्र मराठीजनांना कायमचा बदलावा लागेल.
सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका उरकण्याचे आदेश दिल्याने स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. पण, या सर्व निवडणुका घ्यायच्या कशा, हा मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. राजकीय आवश्यकता आणि सोय पाहूनच निवडणुकांचा घाट घातला जाईल. शहरी आणि ग्रामीण अशी ढोबळ वर्गवारी होईल, असे ढोबळमानाने मानले जात आहे. राजकारणाच्या केंद्रबिंदूवर असलेले नेते आपापला पट मांडत आहेत. दुसरीकडे स्थानिक नेते, पदाधिकारी मात्र अजून चाचपडत आहेत. निवडणुका होणार. पण, कशा आणि कधी याबाबत निश्चित माहिती नाही. त्यामुळे तयारीला कसे लागायचे असा तिढा आहे. म्हणून सध्या तरी मोजुनमापूनच बॅनर लागत आहेत. त्या मानाने सत्ताधारी महायुतीच्या आश्रयाला असलेल्यांना वरून ताकद मिळण्याची हमी आहे. त्यामुळे वर ठरेल तसे, धोरणानुसार राजकारण पुढे सरकत आहे.
एकत्र लढणार की स्वबळावर, याबाबत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूने शेवटपर्यंत झुलविण्याचा उद्योग चालणार अशी चिन्हे आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशी महानगरे दोन्ही बाजूच्या बहुतांश पक्षांसाठी महत्त्वाच्या प्रतिष्ठेच्या आहेत. तर, उर्वरित ठिकाणी त्या त्या भागातील तालेवार नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक जागा कोणा ना कोणासाठी महत्त्वाचीच असणार आहे. शिवाय, ही मिनी विधानसभा उरकली तर पुढच्या निवडणुकांसाठी २०२९ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे कोणताच घटक आताची संधी गमावण्याच्या मनःस्थितीत नाही.
मुंबईचा किल्ला सर करण्यासाठी भाजप आतुर आहे. तर, एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंच्या शंभरहून अधिक माजी नगरसेवकांच्या हाती धनुष्यबाण दिला आहे. त्यामुळे एकत्र लढण्याचे गणित बसणार कसे? मुंबईसाठी अजित पवारांचा विशेष आग्रह नाही. मात्र, पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा जीव गुंतलेला. पण, मागच्या निवडणुकीत इथे कमळ फुलले होते. त्यामुळे घड्याळाच्या काट्यांसह कमळाची पाने कशी खुडणार? हे कमी म्हणून की काय एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना जवळ करत आपला बाणही सोडला, त्यामुळे एकत्र निवडणुकांचा महायुतीच्या नेत्यांचा विशेषतः भाजप नेत्यांचा भाषा नरेटिव्हचा भाग अधिक आहे.