नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील विरार भागामध्ये संरक्षक उपकरणाविना सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची स्वच्छता करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला जाब विचारला आहे. मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र राज्य सरकारला नोटीस बजावून चार आठवड्यात या संदर्भातील उत्तर मागितले आहे.
विरारमधील एका निवासी संकुलामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची साफसफाई करताना चार कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. सर्व चारही कामगार वसई परिसरातील रहिवासी असून, कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय सांडपाणी प्रक्रिया संयंत्राच्या स्वच्छतेसाठी शिरले होते. माध्यमांमध्ये यासंदर्भातील बातम्या आल्या होत्या. या बातम्यांच्या आधारे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून या घटनेची दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
सदर घटनेमध्ये मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करून धोकादायक कामासाठी पिडीतांना नेमण्यात आले होते. कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली आहे. जोखीमीच्या स्वच्छतेच्या कामात सुरक्षा उपकरणांच्या वापराची आवश्यकता याबाबत जागरुकता निर्माण करण्याचे राज्याच्या यंत्रणांचे कर्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. यात दोषींविरुद्ध केलेली कारवाई आणि मृत व्यक्तींच्या निकटवर्तीयांना दिलेली भरपाईची स्थिती यांचाही समावेश असावा, असेही मानवाधिकार आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.