मुंबई: टीईटी पेपरफुटीवरून विधिमंडळात विरोधकांनी सोमवारी सरकारला धारेवर धरले. विधानसभेत अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव नाकारल्यानंतर घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला; तर विधान परिषदेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची तसेच सीबीआय चौकशीची मागणी विरोधकांनी केली व सभात्याग केला.
विधानसभेत विरोधकांनी दिलेली स्थगन प्रस्तावाची सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावली.
त्यानंतर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला. तत्पूर्वी पेपरफुटीची एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश दिले असून सभागृहात सरकार निवेदन करणार असल्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
ठाकरे शिवसेना गटनेते भास्कर जाधव यांनी याप्रश्नी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.
राज्यात नीट आणि टीईटीसारख्या परीक्षांमध्ये वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असल्याने राज्याची देशभर बदनामी होत असून लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे ते म्हणाले. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची नोटीस विरोधकांनी दिलेली नाही. शिवाय सभागृहात पुरवणी मागण्यांवरील चर्चेचे कामकाज असल्याने स्थगन प्रस्ताव स्वीकारता येणार नसल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले. मात्र, या गंभीर घटनेची सरकारने नोंद घ्यावी, असे निर्देश नार्वेकरांनी दिले.
नीट पेपरफुटीचे केंद्र पुणे होते आणि आता टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीचे रॅकेट ठाणे जिल्ह्यात पकडले गेले. त्यामुळे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी विधान परिषदेत केली. मात्र टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी सभापती राम शिंदे यांनी फेटल्यामुळे विरोधकांनी सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत सभात्याग केला.
अनिल परब यांनी, टीईटी पेपरफुटीची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली. ज्याच्या नियंत्रणाखाली ही परीक्षा होणार होती, त्या अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी भाई जगताप यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मंत्री भुसे म्हणाले.
सीबीआय चौकशी
टीईटी पेपरफुटीचे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
नीटपासून ते टीईटी परीक्षेचे पेपर फुटत आहेत. याचे लागेबांधे थेट उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचले आहेत. सूत्रधार कोण हे शोधा. शिक्षण क्षेत्रात अशा पेपरफुटीच्या घटनांनी महाराष्ट्र विश्वासार्हता गमावत चालले असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली.