मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र ही दानशूर लोकांची भूमी म्हणून ओळखली जाते. अवयवदानाच्या शपथ घेण्यासाठीही देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र सात कोटी प्रौढ लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात फक्त १० हजार लोकांनी सेवा पंधरवडयात अवयवदानाची शपथ घेतली आहे.
अवयव प्रत्यारोपणसाठी शेकडो रुग्ण प्रतिक्षेत असून अवयवदान करण्याची संख्या अत्यल्प आहे. ही तफावत दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून राष्ट्रीय आणि प्रादेशिक राज्य अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था जनजागृतीपर कार्यक्रम, व्याख्यान रॅली काढली जाते. यंदाच्या गणेशोत्सव मुंबई महापालिकेने अवयदानाबाबत देखाव्याचा विशेष पारितोषिक दिल होत. रूग्णालयात बेन डेट असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचे समुपदेशनही केले जात आहे तरीही अवयवदान आणि प्रत्यारोपण ही दरी कमी होताना दिसत नाही.
सेवा पंधरवडयात जनजागृती होण्यासाठी शासनाकडून एक लिंक दिली होती. त्यावर आधार कार्ड किंवा आधार क्रमांक टाकून शपथ घेता येते. शपथ घेतल्यावर शपथपत्र संबंधितांना मिळते. मात्र याकडे जनतेने पाठ फिरवली असून फक्त १०,८८० नागरिकांनी शपथ घेतली आहे. आरोग्य विभागातर्फे अवयवदानास प्रोत्साहन देण्यासाठी नुकतीच एक ध्वनिफितही प्रदर्शित करण्यात आली आहे. हजारो लोक डोळे व किडनीच्या प्रतिक्षेत आहेत तर यकृत 'व हृदयाच्या आजारानेही शेकडो ग्रस्त असून त्यांना जीवनदान देऊ शकतो.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त धीरजकुमार यांनी स्वतः अवयवदानाची शपथ घेऊन इतरांनीही अवयवदान करावे असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आरोग्य विभागातील २०० हून अधिक अधिकाऱ्यांनी अवयवदानाची शपथ घेतली