मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तलावापैकी तानसा तलावही आटला असून या तलावामध्ये मुंबई शहराला जेमतेम एक दिवस पुरेल इतकाच म्हणजे ३,८०० दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आता मुंबईकरांची तहान भातसा, मध्य वैतरणा व मोडक सागर या महत्त्वाच्या तलावातून भागवावी लागणार आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अप्पर वैतरणा, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, भातसा ही पाच महत्त्वाची तलाव आहेत. या तलावामधून दररोज सरासरी ४ हजार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. परंतु यापैकी अप्पर वैतरणा तलाव दोन आठवड्या भरापूर्वीच आटला असून आता तानसा तलावही आटला आहे.
तानसा तलावामध्ये १ लाख ४५ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. परंतु या तलावातील पाणीसाठा आता २ टक्केवर आला आहे. त्यामुळे तलावात मुंबईला दररोज जेवढा पाणीपुरवठा होतो तेवढेच पाणी या तलावामध्ये आता शिल्लक राहिले आहे. अन्य तलावातील पाणीसाठ्यातही दिवसेंदिवस घट होत आहे.
मध्य वैतरणा तलावामध्ये १० टक्के म्हणजे जवळपास २० हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी मुंबईला पाच दिवस पुरेल इतकेच आहे. मोडक सागर तलावामध्ये मात्र २८ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा असून ८ ते ९ दिवस पुरेल इतकी आहे. राज्य सरकारच्या भातसा तलावामध्ये मात्र १४ ते १५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. तर तुळशी व विहार तलावामध्ये ३ ते ४ दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे.