मुंबई: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या धर्तीवर घरकाम, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी स्वाभिमान निधी योजेचा प्रस्ताच राज्य सरकारकडे महापालिका प्रशासनाने पाठवला आहे.
हा प्रस्ताव मंजूर तातडीने मंजूर करा अशी आग्रहाची मागणी पालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी किशोर पेडणेकर यांनी केली आहे. पालिका निवडणुकीत ठाकरे गटाने आपल्या जाहीरनाम्यात तशी घोषणा केली होती.
ही अर्थसहाय्य योजना सुरू करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. सभागृहनेते गणेश खणकर यांच्याकडे लेखी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यास सभागृहनेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘स्वाभिमान निधी योजना’ नावाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगार तसेच इतर असंघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला कामगारांना दरमहा २,५०० ते ३,००० रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
पेडणेकर म्हणाल्या की, महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने घरकाम करणाऱ्या महिलांसाठी अर्थसहाय्य करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.
शिवसेनेने सुचविलेल्या योजनेची व्याप्ती वाढवित त्यात सुधारणा करीत तिचे ‘स्वाभिमान निधी’ योजना असे नामकरण करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्वाभिमान निधी’ योजने चा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.
असंघटित क्षेत्रातील उदरनिर्वाह करणाऱ्या अथवा अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटांमुळे अडचणीत आलेल्या महिलांना अधिक आर्थिक आधार देण्याची गरज असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर लाभार्थींची पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.