पुढारी ऑनलाईन डेस्क : "कसलीही पार्श्वभूमी नसताना एक तरुण निवडणूक लढविण्याचा निश्चय करतो. गावागावात त्याची चर्चा होते. बघता बघता लोकंच ती निवडणूक हातात घेतात आणि तो तरुण मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पोहोचतो. त्या मतदारसंघाचे नाव बारामती आणि तो तरुण म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब…!" अशी पोस्ट करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा एक फोटो शेअर केला आहे. (Supriya Sule Post )
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये बंड झाले. महाराष्ट्रातील राजकारणाला एक वळण मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. तेव्हापासून दाेन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांनी लढवलेल्या एका आठणवीला उजाळा देत खास पोस्ट केली आहे. त्यासोबत शरद पवार यांचा कार्यकर्त्यांच्या गराड्यात सायकलीवर बसलेला फोटो शेअर केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या 'X' खात्यावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की,
"कसलीही पार्श्वभूमी नसताना एक तरुण निवडणूक लढविण्याचा निश्चय करतो. गावागावात त्याची चर्चा होते. बघता बघता लोकंच ती निवडणूक हातात घेतात आणि तो तरुण मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पोहोचतो. त्या मतदारसंघाचे नाव बारामती आणि तो तरुण म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब…! त्यांनी पहिली निवडणूक जिंकली त्याला आज ५७ वर्षे पूर्ण झाली. आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांना दिलेली साथ आणि त्यांच्यावर केलेलं प्रेम खुप मोलाचे आहे. हे प्रेम कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपले प्रेम, विश्वास आणि साथ याबद्दल आपणा सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार."
शरद पवारांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील 'काटेवाडी' या छोट्याशा गावातील गोविंदराव आणि शारदाबाई या दाम्पत्यापोटी 12 डिसेंबर 1940 झाला. काटेवाडी ते मंत्रालय या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक अनेक पदाभार सांभाळले. एका कॉलेजचा जीएस (General Secratery) ते केंद्रीयमंत्र्यापर्यंतचा प्रवास आहे. आतापर्यंत ते महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. वयाची ८३ (Sharad Pawar Birthday) गाठलेल्या हा माणूस आजही राजकारणात सक्रीय आहे. शरद पवार यांनी २२ फेब्रुवारी १९६७ रोजी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. निवडणुकीतील त्यांचा हा पहिला विजय. अवघ्या २६ व्या वर्षी शरद पवार यांनी आपल्या विधिमंडळ, संसदीय राजकारणाची सुरुवात केली.
पक्षाची स्थापना मी केली आणि पक्ष व चिन्ह मात्र दुसर्या गटाला दिले, हा सत्तेचा गैरवापर आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी बुधवारी (दि.२१) पत्रकार परिषदेत केली. मला सगळे सोडून गेल्याची चिंता नाही. 1980 मध्ये माझ्याकडे 59 आमदार होते. मी परदेशातून फिरून आल्यावर फक्त 5 आमदार शिल्लक राहिले. जे सोडून गेले, त्यातील 95 टक्के पुढील निवडणुकीत पराभूत झाले. इतिहासाची पुनरावृत्ती नेहमीच होईल, असा इशारा पवार यांनी अजित पवार गटाला दिला.