Sunetra Pawar Congress criticism
मुंबई: बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारताच पत्रकार परिषदेत मंत्री धनंजय मुंडे यांनी एका पत्रकाराला बोलण्यापासून रोखलं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत कडक शब्दांत टीका केली आहे. "धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा आहेत का?" असा थेट सवाल काँग्रेसने आपल्या पोस्टद्वारे उपस्थित केला आहे. या वादात काँग्रेसने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. सुनेत्रा पवार यांचा उल्लेख 'गुंगी गुडीया' असा करत काँग्रेसने जोरदार टीका केली. "सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडीया बनून राहणार?" असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. काँग्रेसच्या टीकेनंतर अंजलि दमानिया मात्र चांगल्याच संतापल्या आहेत.
बीडमधील पत्रकार परिषदेत घडलेला हा प्रकार आणि त्यानंतर काँग्रेसने केलेल्या टीकेनंतर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''गुंगी गुडिया' ही भाषा एका पक्षाला शोभते का? पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? मी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत' असे म्हणत दमानिया यांनी काँग्रेसचा निषेध केला आहे.
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निधीसह प्रशासन पातळीवरील प्रयत्न कुठेही कमी पडू दिले जाणार नाहीत अशी ग्वाही देतानाच स्व. अजित पवार यांच्या स्वप्नातलं बीड आणि त्याचा विकास पूर्ण करण्याचे अभिवचन मी देते, असे राज्याच्या उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर स्व. अजित पवार यांचे बीड जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी मला साथ द्यावी, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची सभा पार पडली यामध्ये 2026-27 या वर्षासाठी 623 कोटी रूपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा बनवताना दादांनी दिलेल्या सूचना पुढेही सुरू ठेवाव्यात असे निर्देश देण्यात आले. याबाबतचे सविस्तर सादरीकरण या सभेत झाले. जिल्हा नियोजनात जिल्हा परिषद आणि इतर यंत्रणांना जो निधी दिला जातो त्याचा योग्य प्रकारे विनियोग करून लोकांच्या विकासासाठी प्रयत्न असावेत. असेही सांगण्यात आले आहे. विकासकामात पारदर्शकता व आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे. तसेच नियोजन करताना ही कामे प्रशासनाची गरज आणि लोकप्रतिनिधींची मागणी याचा समन्वय राखणारी असावी, अशा सूचना श्रीमती पवार यांनी या बैठकीत दिल्या.