मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज भरताना झालेल्या किरकोळ चुका विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या अडचणी ठरू नयेत, यासाठी शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्जातील चुकीच्या माहितीमुळे प्रवेश नाकारण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश फेरीपूर्वी अर्जातील माहिती दुरुस्त करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून नियमित प्रवेश फेरी क्रमांक १ अंतर्गत १ जून रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुरू असताना अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जातील माहिती आणि सादर केलेल्या कागदपत्रांतील तपशीलांमध्ये तफावत आढळून आली.
काही ठिकाणी प्रवर्ग, गुण, आरक्षण, जन्मतारीख किंवा अन्य माहिती चुकीची भरल्याने संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज नाकारल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाने अर्जातील त्रुटींमुळे प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश फेरीत आवश्यक ती माहिती दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांना वर्षभराचा फटका बसणार नाही.
यासंदर्भातील सूचना सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थी आणि पालकांपर्यंत ही माहिती तातडीने पोहोचविण्याचे आदेशही स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनाही या निर्णयाची माहिती देण्यात आली असून, संबंधित विद्यार्थ्यांना अर्जदुरुस्तीबाबत योग्य मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेश नाकारला गेला असला तरी विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता पुढील फेरीसाठी अर्जातील त्रुटी दूर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे