मुंबई: राज्यात यंदा तब्बल 6 हजार 612 शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून, त्यामध्ये मुंबई विभागाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मुंबई विभागातील एकूण 1 हजार 461 शाळांनी शंभर टक्के निकालाची कामगिरी केली आहे. त्यामध्ये मुंबई जिल्ह्यातील सर्वाधिक 595 शाळांचा समावेश असून, पश्चिम उपनगरातील शाळांनी आघाडी घेतली आहे.
दहावीचा शंभर टक्के निकाल लागणाऱ्या शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याने शाळांकडूनही निकाल उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. यंदाही मुंबई विभागातील अनेक शाळांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली.
एकूणच मुंबईतील 595 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून, त्यामध्ये पश्चिम उपनगरातील सर्वाधिक 259 शाळांचा समावेश आहे. त्याखालोखाल मुंबई शहरातील 176 आणि पूर्व उपनगरातील 160 शाळांनी शतकी निकाल नोंदवला आहे.
ठाणे- ठाणे जिल्ह्यानेही उल्लेखनीय कामगिरी करत 442 शाळांचा निकाल 100 टक्के लावला. त्यामध्ये ठाणे व नवी मुंबई परिसरातील 143 शाळा आघाडीवर आहेत. डोंबिवलीतील 96, भाईंदरमधील 68, बदलापूरमधील 43, मुरबाडमधील 28 शाळांनी शंभर टक्के निकालाची नोंद केली. तसेच उल्हासनगर व भिवंडी येथील प्रत्येकी 18, तर कल्याण तालुक्यातील 13 शाळांनीही शतकी यश मिळवले आहे.
रायगड- जिल्ह्यातील पनवेल परिसरातील 63 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून, खालापूरमधील 36, महाडमधील 28, कर्जतमधील 23 शाळांनीही उल्लेखनीय यश संपादन केले. रोहा व माणगाव येथील प्रत्येकी 18, पोलादपूरमधील 13, तर उरण, अलिबाग आणि श्रीवर्धनमधील प्रत्येकी 10 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. याशिवाय मुरुडमधील 9 आणि म्हसळा तालुक्यातील 7 शाळांनीही शतकी निकाल नोंदवला आहे.
पालघर- जिल्ह्यातील नालासोपारा परिसराने सर्वाधिक 91 शाळांसह आघाडी घेतली. बोईसरमधील 36, डहाणूमधील 15, जव्हारमधील 10 आणि वाडामधील 8 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. तसेच मोखाडा, विक्रमगड आणि तलासरी येथील प्रत्येकी 7 शाळांनीही शतकी बाजी मारल्याचे या निकालात दिसून आले.