मुंबई: दक्षिण मुंबईत पाण्याची गळती होणाऱ्या पाण्याच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यासह नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्यामुळे दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट, कुलाबा, फोर्ट, ग्रँटरोड, मुंबई सेंट्रल भायखळा परिसर पाणीटंचाईमुक्त होणार आहे.
जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती व जलवाहिन्यांची कमतरता यामुळे दक्षिण मुंबईत पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने येथील जुन्या जलवाहिन्या बदलून त्या ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही भागात नव्याने जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
पावसाळा वगळून हे काम 16 महिन्यात पूर्ण करण्याचे टार्गेट कंत्राटदाराला देण्यात आले आहे. त्यामुळे 2028 पर्यंत हे काम पूर्ण होऊन त्यामुळे या भागातील पाणीपुरवठ्यामध्ये मोठी सुधारणा होईल. दक्षिण मुंबईतील पाणीटंचाई दूर होईल, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.
या भागांना दिलासा
ए विभाग : नरिमन पॉईंट, कुलाबा, फोर्ट
बी विभाग : पायधुनी, भेंडी बाजार, डोंगरी, महम्मद अली रोड
डी विभाग : ग्रँटरोड, मुंबई सेंट्रल, ताडदेव, नाना चौक, मलबार हिल
ई विभाग : भायखळा, नागपाडा, माझगाव, आग्रीपाडा