मुंबई : सततच्या पावसामुळे मुंबईत डासजन्य आजारांनी पुन्हा डोके वर काढले असून दक्षिण मुंबईतील डी आणि ई विभाग डेंग्यू व मलेरियाचे 'हॉटस्पॉट' ठरले आहेत. या दोन्ही विभागांत रुग्णसंख्येसह डासांच्या उत्पत्तीस्थळांचीही सर्वाधिक नोंद झाल्याने मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक तीव्र केल्या आहेत.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या (एनव्हीबीडीसीपी) १ जानेवारी ते २७ जुलै २०२६ या कालावधीतील आकडेवारीनुसार, राज्यात डेंग्यूचे १,०२१ रुग्ण आढळले असून त्यापैकी तब्बल ३१९ रुग्ण मुंबईतील आहेत. रायगडमध्ये २२६, पुण्यात १७३, नागपुरात ५०, तर नाशिक आणि ठाण्यात प्रत्येकी ५८ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत यंदा डेंग्यूमुळे एकाही मृत्यूची नोंद नसली, तरी शहरातील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात चिकुनगुनियाचे ३३ रुग्ण आढळले असून झिका विषाणूचा एकही रुग्ण नोंदलेला नाही.
महापालिकेच्या विभागनिहाय आकडेवारीनुसार, डी विभागात डेंग्यूचे सर्वाधिक १५ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ सी विभागात २, ई विभागात ८ आणि बी विभागात ३ रुग्णांची नोंद झाली आहे. ए विभागात डेंग्यूचा एकही पुष्टी रुग्ण नसला, तरी तीन संशयित रुग्ण आढळले आहेत. मलेरियाचा सर्वाधिक प्रादुर्भाव ई विभागात असून तेथे ६४ रुग्णांची नोंद झाली आहे.
डी विभागात २२, सी विभागात १९, ए विभागात १७आणि बी विभागात ९ रुग्ण आढळले आहेत. कीटकनियंत्रण विभागाच्या पाहणीत ई विभागात अॅनोफिलीस डासांची ७२२, तर एडीस डासांची १,२३७ उत्पत्तीस्थळे आढळली आहेत. विशेष म्हणजे ए विभागात एडीस डासांची १,०३१ उत्पत्तीस्थळे असूनही डेंग्यूचा एकही पुष्टी रुग्ण नोंदलेला नाही. दरम्यान, पाणीजन्य आजारांमध्येही ई विभाग आघाडीवर असून तेथे तीव्र जठरांत्रशोथाचे ३४ आणि टायफॉइडचे ९ रुग्ण आढळले आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घर व परिसरात पाणी साचू न देणे, ताप आल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेणे आणि डासांपासून संरक्षणाची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.