मुंबई: पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर शुक्रवारी ऐन कार्यालयीन वेळेत लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येते.
मात्र, हा तांत्रिक बिघाड नसून सकाळी आणि दुपारी दोन रेल्वे मोटरमन (लोको पायलट) यांनी लाल सिग्नल तोडल्यामुळे ही गंभीर परीस्थित निर्माण झाली होती.
एकाच दिवशी दोन मोटरमनने सिग्नल तोडल्याचे प्रकरण रेल्वेकडून दाबले जात असल्याची चर्चा पश्चिम रेल्वे मोटरमन वर्तुळात आहे. याबाबत वारंवार विचारना करूनही संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आलेली नाही.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दादर ते चर्चगेट स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर सकाळी ८. ०५ वाजता चर्चगेट रेल्वे स्थानक इथे पॉइंट फेल्युअर झाल्याचे सांगण्यात येते.
त्यामुळे बऱ्याच काळ या मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी होती. मात्र हा पॉइंट फेल्युअर नसून एका मोटरमनने लाल सिग्नल तोडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती असे बोलले जात आहे.
त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा एका मोटरमनने लाल सिग्नल तोडल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली होती. तेव्हाही तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन रेल्वे प्रशासन ही दोन्ही प्रकरणे प्रवाशांपासून लववून ठेवल्याची चर्चा पश्चिम रेल्वे लोको पायलट वर्तुळात आहे.
भारतीय रेल्वे स्वदेशी ट्रेन टक्कर विरोधी प्रणाली 'कवच' वापरत आहे. जर मोटरमन चुकून लाल सिग्नल ओलांडत असेल, तर हे तंत्रज्ञान आपोआप ट्रेनचे ब्रेक लावून गाडी थांबवते. त्यानंतर ही अशा घटना घडत असल्याने अनेक गोष्टीवर प्रश्नचिह्न केले जात आहे.
सिग्नल तोडल्यास तत्काळ निलंबन
रेल्वे मोटरमन कडून लाल सिग्नल तोडल्याची घटना घडल्यास त्याची रेल्वे प्रशासनाकडून गंभीर चौकशी केली जाते. कारवाई म्हणून मोटरमनला तात्काळ सेवेतून निलंबित करून चौकशी बसवली जाते. मोटरमनची मद्यपान चाचणी आणि इतर वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. चौकशीत दोषी आढळल्यास नोकरीवरून कमी करणे किंवा पदावनती यासारख्या कठोर दंडात्मक कारवाया केल्या जातात.