मृणालिनी नानिवडेकर
मुंबई: शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषद निवडणुकीसाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. मात्र बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती हा पक्ष शिवसेनेत विलीन करावा अशी अट घाला, ही मागणी शिंदे गटातील काही नेत्यांनी पुढे केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाची प्रतिमा अधिक प्रभावी करायची असल्याने बच्चू कडू ही त्यांची परिषद निवडीसाठी प्रथम पसंती आहे. मात्र विलीनीकरणाबाबत त्यांची भूमिका पाहावी लागेल. बच्चू कडू यांच्यासारखा लढवय्या आणि आक्रमक नेता विधान परिषदेत असेल तर पक्षाची भूमिका जनमानसात पोहोचेल, असे शिंदे यांना वाटते.
काही दिवसांपूर्वी शिंदे यांनी बच्चू कडू यांना भेटीला बोलावले होते. शिंदे यांच्या बंडावेळी कडू यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यावेळी कडू यांची विधाने व घेतलेला आक्रमक पवित्रा हा शिंदे यांना मदतीचा ठरला होता. असा नेता जर आपल्यातर्फे परिषदेत गेला तर त्याचा उपयोग होईल तसेच विदर्भात पक्षाला पाय रोवून उभे राहता येईल, असा शिंदे यांचा कयास आहे.
कडू यांच्या होकाराची वाट पाहिली जात आहे. नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित झाले आहे. महिला आरक्षणाचा विषय गाजत असताना गोऱ्हे यांना संधी देणे महत्त्वाचे मानले जाते आहे. बच्चू कडू हे नाव कितीही चांगले असले तरी त्यांनी प्रहार जनशक्ती हा आपला पक्ष शिवसेनेत विलीन करावा, तरच त्यांच्या नावाचा विचार होईल असे त्यांना सांगावे, अशी शिंदे गटातील काही नेत्यांची भूमिका आहे.
ही भूमिका नेते शिंदे पिता-पुत्राकडे मांडणार आहेत. शिंदे यांनी विधानसभा व लोकसभेत पराभूत झालेल्या किंवा लढण्याची संधी न मिळालेल्यांना परिषदेवर नेमले. भावना गवळी, हेमंत पाटील आणि कृपाल तुमाने यांना या धोरणामुळे परिषदेवर नेमले गेले आहे. मात्र सध्या शिवसेना शिंदे गट परिषदेत नेमकी काय भूमिका घेतो याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मनीषा कायंदे यांचे काम चांगले असले तरी खंबीर भूमिका घेणारा चेहरा हवा आहे. बच्चू कडू हे नाव त्यासाठी योग्य असल्याचे शिंदे यांचे मत आहे. बच्चू कडू यांनी सरकारी अधिकाऱ्याला मारल्याचा गुन्हा यापूर्वी दाखल झाल्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपची भूमिका पाहावी लागेल. बच्चू कडू यांना पक्ष विलीन करायचा आहे काय, तसा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला आहे काय हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असता ते कार्यक्षेत्रात आहेत एवढेच उत्तर देण्यात आले.
पटेल, तटकरेंची नावे मान्य होतील?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक आमदार निवडून येणे निश्चित आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या मताने हा उमेदवार ठरवला जाईल की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या मुलांशी सल्लामसलत करून हा चेहरा निवडतील याविषयी कुजबुज आहे. राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे पाठीराखे परिषदेत जाण्यासाठी उत्सुक आहेत, तर सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांचीही चर्चा आहे. पटेल आणि तटकरे या दोन्ही नेत्यांबद्दल पवार कुटुंबीय काहीसे नाराज असल्याची चर्चा सुरू होती.
ठाकरे लढणार नसतील तर शिंदेंचा तिसरा उमेदवार रिंगणात?
ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला, तर शिंदे गटातर्फे तिसरा उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरवला जाऊ शकेल. त्या संदर्भात भाजपची भूमिका काय असेल याकडेही लक्ष दिले जाते आहे.