मुंबई

इंडिया आघाडीचे सरकार बनविण्याबाबत शरद पवारांचा मोठा खुलासा

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करण्याविषयी आपली कोणाशीही चर्चा झाली नसल्याचे सांगतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एनडीएसोबतच राहणार असल्याचे मी वाचले आहे. त्यांच्याबद्दल मला काहीही माहिती नसल्याचे राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.

लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, राज्यात आमच्या पक्षाने चांगली कामगिरी बजावली आहे. आता इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतरच पुढील रणनीती ठरवली जाईल. इंडिया आघाडीचे सरकार बनविण्याचा प्रयत्न करण्याबाबत नितीश कुमार यांच्यासह कोणाशीही आपला संवाद झालेला नाही. संपूर्ण चित्र स्पष्ट होईपर्यंत चर्चा करणे योग्य नाही. उत्तरप्रदेशाबद्दल मला माहिती नाही, पण महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जनतेमध्ये मोठी नाराजी होती. निवडणुकीचे निकाल हे त्यावर जनतेनेच दिलेले उत्तर आहे.

इंडिया आघाडीतील पुढच्या सर्व गोष्टींसाठी माझे एकट्याचे मत महत्त्वाचे नाही. आमच्या सहकाऱ्यांची मनस्थिती विचारात घेऊन सामूहिकपणे पुढचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.

निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याशी आपला संवाद झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्याविषयी छेडले असता, त्यावर काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. त्यांची स्थिती काय आहे, याबद्दल ते स्वतःच बोलतील, असेही शरद पवार यांनी म्हणाले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT