मुंबई : राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव निश्चित केले आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने या जागेवरील दावा सोडला आहे.
राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू होती. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांनी एकमेव जागा लढवली तर राज्यसभेची सातवी जागा ते जिंकू शकतील. मात्र या एकमेव जागेसाठी तिन्ही पक्षांनी दावा केला होता. या जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असे संकेत खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दिले होते. तर आदित्य ठाकरे यांनी, आमचे 20 आमदार आहेत, त्यामुळे या जागेवर आमचा हक्क आहे, असा दावा केला होता.
काँग्रेसला राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद वाचविण्यासाठी दोन जागांची गरज आहे. त्यातील एक जागा तेलंगणामधून व एक महाराष्ट्रातून निवडून आली तर त्यांचे विरोधी पक्षनेतेपद वाचू शकते. त्यामुळे काँग्रेसचे नेते शरद पवार गट आणि ठाकरे गटाला आग्रह करत होते. पक्षाचे नेते खासगीत मात्र , शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा लागेल, असे सांगत होते.
शरद पवार हे राज्यसभेवर जावेत ही आमची इच्छा आहे. दिल्लीत पक्षाचे अस्तित्व हे त्यांच्यावर अवलंबून आहे. सद्य राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनी सक्रिय राहणे महत्त्वाचे आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाही महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार हे निश्चित झालेले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असताना एका जागेसाठी काँग्रेससह शिवसेनेनेही (ठाकरे) दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी चर्चा केली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्यासाठी जागा सोडण्यास होकार दिला आहे. त्यामुळे शरद पवार हे आता आघाडीचे उमेदवार असतील.
महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्चला निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राच्या सात जागांसाठीची अधिसूचना 26 फेब्रुवारीला जारी करण्यात आली. 5 मार्च नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
सुप्रिया सुळेंचा थेट राहुल गांधींशी संपर्क
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्यासाठी राज्यसभेची जागा सोडावी, अशी विनंती काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केली होती. त्यामुळे काँग्रेस शरद पवार यांच्यासाठी जागा सोडण्यास राजी झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन उमेदवार उतरवण्यासाठी आग्रही आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे सहा उमेदवार निवडून येतील हे निश्चित असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्य एक उमेदवार रिंगणात उतरवायची तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाने होकार दिल्यास शिंदे गटातर्फे दोन उमेदवार रिंगणात उतरवले जातील. प्रारंभी निवडणूक बिनविरोध होऊ देऊ नये, भारतीय जनता पक्षाने एक आणखी उमेदवार उतरवावा अशी दिल्लीची भूमिका होती.मात्र आता शिंदे गटाने आम्हीच दुसरा उमेदवार उतरवतो अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भातला अंतिम निर्णय उद्या होईल असे मानले जाते. 18 जणांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत.
काँग्रेसला राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद वाचविण्यासाठी दोन जागांची गरज आहे. त्यातील एक जागा तेलंगणामधून व एक महाराष्ट्रातून निवडून आली, तर त्यांचे विरोधी पक्षनेतेपद वाचू शकते. त्यामुळे काँग्रेसचे नेते शरद पवार गट आणि ठाकरे गटाला आग्रह करत होते.
दुसरीकडे, आदित्य ठाकरे हे आमचे 20 आमदार आहेत, त्यामुळे या जागेवर आमचा हक्क आहे, असे कालपर्यंत सांगत आले. मात्र, या दोन्ही पक्षांचे नेते खासगीत शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा लागेल, असे सांगत होते.
या परिस्थितीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने उमेदवारीवर जाहीर दावा न करता शरद पवारांची उमेदवारी एकाच वेळी ठाकरे गट आणि ठाकरे सेनेतही चर्चेत ठेवली. हे राज्यसभेवर जावेत, ही आमची इच्छा आहे. दिल्लीत पक्षाचे अस्तित्व हे त्यांच्यावर अवलंबून आहे. सद्य राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनी सक्रिय राहणे महत्त्वाचे आहे, असे शरद पवार गटाच्या नेत्यांना वाटतेे.