नरेश कदम
मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्याची योजना (ऑपरेशन टायगर) तूर्तास स्थगित करण्यात आली असली, तरी यासोबतच शरद पवार गटाचे सहा खासदार गळाला लावण्याचा सापळा रचण्यात आला आहे.
मात्र, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी शरद पवार गटाचे खासदार फोडण्याच्या शिंदे यांच्या या योजनेला लगाम लावला आहे. शरद पवार गटाचे नाराज खासदार महायुतीत सामील होणार असतील, तर ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटात घेतले जातील, असे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी शिंदे यांना सांगितले असल्याचे कळते.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यात राजकीय फटाके उडतील, अशी भाकिते काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासह शिंदे गटाच्या नेत्यांनी केली होती. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाचे खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिंदे यांचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार होते; पण तूर्तास ते स्थगित झाले आहे.
शरद पवार गटाचे सहा खासदार खेचण्याची शिंदेंची रणनीती
ठाकरे गटाच्या सहा खासदारांबरोबरच शरद पवार गटाचे सहा खासदार गळाला लावण्याची योजना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिजली होती. अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर शरद पवार गटाचे खासदार फोडण्याच्या शिंदे यांच्या या योजनेला गती आली होती.
विलीनीकरणामुळे अजित पवारांचे उपयुक्त मूल्य वाढणार होते
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या स्वप्नातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणखी मजबूत करू, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार यांनी ‘एनडीए’सोबत जाण्याचा निर्णय आत्मविश्वासाने घेतला होता. लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीवेळी आम्हा सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन संघटन उभे केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा 72 टक्के स्ट्राईक रेट राहिला होता. सुनेत्रा पवार या पक्षाच्या अध्यक्षा आहेत. आम्ही सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेऊ, असेही तटकरे यांनी विरोधकांना सुनावले.