शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत. Pudhari Photo
मुंबई

Sanjay Raut |"पहिला अधिकार शिवसेनेचा..." : राज्यसभा निवडणुकीबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

न्यायालयातील 'त्या' खटल्याबाबत माफी मागितली नाही, खेद व्यक्त केला

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut on Rajya Sabha election

मुंबई : राज्यसभेच्या उमेदवारांवरून आमच्या विसंगत भूमिका अजिबात नाही. आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाहीये. सर्वाधिक मोठा २० आमदारांचा पक्ष आमचा आहे, हे आधी मान्य केलं पाहिजे. दुसरा क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे १६ आमदार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आहेत. त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल. त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे. आदित्य ठाकरे याच्यापेक्षा वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं आहे असं मला वाटत नाही, अशा शब्दांमध्ये राज्यसभा निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २२) माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

मी काय चुकीचं सांगितलं?

राज्यसभेसाठी ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांची इच्छा आहे, असे मी म्हणालो. त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यावर आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ; पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क शिवसेनेचा आहे, हे आधी स्वीकारलं पाहिजे. हीच चर्चा सुरू आहे, असेही स्पष्ट करत अद्याप माननीय शरद पवार यांनी स्वतःची उमेदवारी त्यांच्या पक्षाकडून जाहीर केलेली नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे. तुमच्याशी त्यांची चर्चा? तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण त्यावेळी, आता जसं काही बदल झाले तसे बदल झालेले पाहून तुम्ही फार त्यावर टेन्शन किंवा प्रेशर घेऊ नका. महाविकास आघाडी जे आहे किंवा नेतृत्व जे आहे आमचं, हे सक्षम आहे निर्णय घ्यायला, असा दावाही त्यांनी केला.

आदित्य ठाकरे चुकीचं विधान करणार नाहीत

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा एक तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार जाईल, असे आदित्य ठाकरे सांगत आहेत. आदित्य ठाकरे यांना राजकारणाची आणि विधिमंडळाच्या कामाची चांगली जाण आहे. गेल्यावेळेस शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी असे दोन खासदार निवडून गेले होते. त्यामुळे यावेळेसही आमचे दोन खासदार निवडून जातील, असं आदित्य ठाकरे म्हणतात. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो, आमचाही आकडा जास्त होता. हे आहे. आदित्य ठाकरे अशा प्रकारे चुकीचं विधान करणार नाहीत. एक खासदार निवडून जाईल. ३७ चा कोटा आहे. या वेळी आमच्याकडे १० ते १२ मते जास्त राहतील असं दिसतंय. आम्हाला पुन्हा २०-२१ मतांची बेगमी करावी लागेल. ती जर होत असेल तर दोन जातील; पण या क्षणी शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे आम्ही हे बोलणारच, असेही राऊत म्हणाले.

मुंबईत सुखाने राहायचं असेल तर महापालिकेच्या राजकारणात जाऊ नये

मी माझ्या जीवनामध्ये कधीही महापालिकेच्या राजकारणामध्ये पडलो नाही. ज्याला या मुंबईत सुखाने राहायचं आहे, त्यांनी महापालिकेत जाऊ नये. कोणत्याही सर्व महानगरपालिकांत काय चालतं ते तुम्हाला माहिती आहे. आम्ही त्या तलावाच्या बाहेर असतो. महापालिकेचं राजकारण वेगळं, आम्ही वेगळं काम करतो. त्याच्यामुळे स्वतः पक्षनेतृत्व त्या संदर्भात निर्णय घेण्यास समर्थ आहे, असेही राऊत यांनी सांगितले. चंद्रपूरमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई झालेली नाही, याबाबत बोलताना भारतीय जनता पक्षासोबत जाणं हे पक्षाचं धोरण नाही. अजिबात नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

'त्या' खटल्याबाबत माफी मागितली नाही, खेद व्यक्त केला

दादा भुसेचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. ज्या खटल्यासंदर्भात आम्ही सातत्याने एकमेकांच्या विरुद्ध उभे होतो, तो मूळ खटला जो आहे हा अद्वय हिरे यांचा आहे. त्याच्यावर मी भाष्य केलेलं आहे. आता स्वतः अद्वय हिरे हे भारतीय जनता पक्षात गेले. त्याच्यामुळे तो खटला चालवायची जबाबदारी आता भाजपची आहे. काय त्यांना उत्तर दिलं? ते म्हणाले की यांनी माफी मागितली. मी माफी मागितली नाही, मी खेद व्यक्त केला. कागद बघू शकता की हिरे यांचा खटला होता. त्याच्यामध्ये मी भाष्य केलं. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करणं आणि माफी मागणं हे दोन भिन्न शब्द आहेत. बरोबर? खेद व्यक्त केला. आणि यापुढे खटला चालवायची जबाबदारी अद्वय हिरे यांची आहे. ही भूमिका आहे. यात काय माफी आणि काय कसलं काय? शेकडो खटले मी लढलोय; पण कुठे थांबायचं आणि काय करायचं आम्हाला माहिती आहे, असे सांगत त्यांनी या विषयावरील आपले मत स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठरावच आणला पाहिजे

यावेळी संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठरावच आणला पाहिजे. होऊ द्या चर्चा, ठीक आहे तुमचं बहुमत असेल; पण विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीने वागतायत, याला लोकशाहीच्या भाषेत म्हणायचं तर मनमानी आणि झुंडशाही. अशा पद्धतीने विधानसभा, विधिमंडळ चालवलं जातंय. तुमच्या अधिकाराच्या गोष्टी सांगताय, कोणाला? तुम्हाला अधिकार दिले कोणी? तुम्हाला अधिकार लोकशाहीने आणि संविधानाने दिलेले आहेत. त्याच लोकशाही आणि संविधानाविरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित पाहताय, हे अनेकदा उघड झालंय. हाच मुद्दा विधानसभेत, विधिमंडळात आला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT