Sanjay Raut on India vs Pakistan match
नवी दिल्ली : "भारत-पाकिस्तान सामना आम्ही पाहातच नाही. हा भाजपचा खेळ आहे. निवडणुका आल्या की, हिंदू-मुसलमान मुद्दा उकरून काढायचा. पाकिस्तानवर बहिष्काराची भाषा कराची, बांगलादेशींना हुसकायचं; मात्र जेव्हा पैशांचा विषय येतो तेव्हाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शहा सामन्याला परवानगी देतात, असा हल्लाबोल करत पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानते; मग त्यांच्याशी का सामना खेळता, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१५) माध्यमांशी बोलताना केला.
टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊच शकत नाही. कोणीही काही बोलू द्या. मुंबईने भाजपने त्याचे नाव दिले आहे. मानखुर्दला एका बागेला नाव दिले आहे. टिपू सुलतानला मानणारे भाजपमध्ये आहेत, असा दावा करत भारत-पाकिस्तान सामन्यावर जुगार खेळला जातो, मागच्यावेळी 25 हजार कोटी पाकिस्तानला जाते, यंदा जास्त जाते, आणि हेच पैसे पुलवामा सारख्या ठिकाणी वापरतात, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी अलिबाग येथील जमिनीच्या मुद्द्यावरून राहुल नार्वेकर यांना थेट सवाल केला. "अलिबागला दीक्षा शाह यांची जमीन किती आहे, हे नार्वेकर यांनीच सांगावे," असे राऊत म्हणाले. या व्यवहारात दलाली कोणी केली, हे सर्वांना माहीत असल्याचा दावाही त्यांनी केला. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, "तो व्हिडिओ पाहिल्यावर सर्व सत्य समोर येते. आधी त्या महिलेच्या कानफटात मारण्यात आली आणि त्यानंतर पळापळ झाली. या प्रकरणातील आणखी सत्य बाहेर आले, तर नार्वेकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल." 'ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी' असा टोला लगावत आपणही त्याच भागातील असल्याने आपल्याला सर्व गोष्टींची खडानखडा माहिती असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुंबईतील मेट्रो प्रकल्पावरून राऊत यांनी संताप व्यक्त केला. "सध्या अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे. हे सर्व कंत्राटदार बाहेरचे आहेत, त्यांना मुंबईची आणि इथल्या भौगोलिक परिस्थितीची काहीच माहिती नाही," अशी टीका त्यांनी केली. तसेच, काल ज्या सरपंचांचे निधन झाले, ते भाजपचे कार्यकर्ते आणि रामभक्त होते, असे सांगत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
'सामना'तून ठाकरे बंधूंचे कान टोचल्याच्या चर्चेवर राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "मी कोणाचेही कान टोचलेले नाहीत, मी फक्त माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी लिहिणारा माणूस आहे, त्यामुळे जे वाटले ते लिहिले. प्रत्येक निवडणूक ही गांभीर्यानेच घेतली पाहिजे, हेच माझे मत आहे."
गणेश नाईक, श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यातील भांडण तंटामुक्ती अध्यक्षांनी सोडवावे, तेच त्यांच्यासाठी योग्य ठरेल," असा टोलाही राऊत यांनी लगावला.