Sanjay Raut press conference : "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना 'येड्या-गबाळ्याच्या' हाती देणे हा मोठा घोटाळा आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने केलेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा राजकीय घोटाळा आहे," असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. ३०) माध्यमांशी बोलताना केला. "सर्वोच्च न्यायालयाला कायद्याच्या चौकटीत राहूनच निकाल द्यावा लागेल. तो निकाल आमच्याच बाजूने लागेल. देशातील कायद्यानुसार भारतीय संविधानाचे पालन न्यायालयाने केले, तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला प्रत्येक आमदार-खासदार अपात्र ठरेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
"देशाच्या गृहमंत्र्यांना आता शोधावे लागत आहे. नुकताच 'लापता लेडीज' हा चित्रपट आला होता; आता मला वाटते की 'लापता गृहमंत्री' असा नवीन चित्रपट बनवावा लागेल," असा टोला लगावत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तुमच्यावर सातत्याने टीका करत आहेत आणि तुम्ही गायब आहात, याचे कारण काय?, असा सवालही त्यांनी केला.
"जंतर-मंतरवर आंदोलकांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले, याची नोंद संसद मार्ग पोलिस ठाण्याच्या डायरीत झाली आहे. दिल्ली पोलिसांना आदेश देण्याचा अधिकार थेट गृहमंत्र्यांना असतो. त्यामुळे तो लाठीचार्ज अमित शहा यांच्याच आदेशाने झाला आहे," असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.
"लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी हीच संपूर्ण देशाची भावना आहे. खरं तर पुलवामा हल्ल्यानंतरच अमित शाह यांचा राजीनामा घ्यायला हवा होता; मात्र तेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचे कारण सांगून तो टाळण्यात आला. अमित शाह हे दोन्ही बाजूंनी दोषी आहेत," असे संजय राऊत म्हणाले.
केंद्र सरकारवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, "केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह लोकसभेत खोटे बोलले आहेत. त्यांनी केवळ लिहून दिलेले भाषण वाचून दाखवले. ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या, ती माणसे स्वतः समोर आली होती. अमित शहा हे 'जनरल कायर' आहेत. अशा 'जनरल कायर'ला पुण्यात पुरस्कार देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. या गोष्टीला संपूर्ण पुणेकरांनी जोरदार विरोध केला पाहिजे," असे मतही त्यांनी व्यक्त केले.