पनवेल: देशातील अत्याधुनिक विमानतळांपैकी एक मानले जाणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मान्सून दाखल होण्यापूर्वीच झालेल्या किंचित पावसातही गळू लागले. विमानतळाच्या बॅगेज बेल्टवरच छतामधून पाणी कोसळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शुक्रवारी व्हायरल झाला.
या गळतीमुळे बेल्टवर प्रवाशांच्या बॅगाही भिजल्या. जवळपास १९ हजार कोटी रुपये खर्च करून हे टर्मिनल उभे करण्यात आले आहे. दररोज सुमारे २० हजार प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतात, तर १५० हून अधिक विमानांची ये-जा येथे होत असते.
मात्र अवघ्या सहा महिन्यांतच हे टर्मिनल गळू लागले. या व्हीडिओची दखल घेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने खुलासा करताना बॅगेज बेल्टवर टर्मिनलचे छत गळू लागल्याचे मान्य केले. जिथे प्रचंड पाणी कोसळत होते तो भाग तातडीने बंद करण्यात आला आणि अर्ध्या तासात ही गळती थांबवण्यात आली व सामान बेल्ट पुन्हा सुरू झाल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे.